![Pune : बिबट्याचे पशुधनावर हल्ले सुरूच](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F06%2FBibatya.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे : पुढारी वृत्तसेवा : नववर्षातदेखील बिबट्याचे पशुधनावरील हल्ले काही सरता सरेनात असे दिसत आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात दिवसाढवळ्या बिबट्या दिसत असून, त्याचे पशुधनावर शेतकर्यांच्या डोळ्यादेखत हल्ले सुरू आहेत. मात्र वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे. पिंपरखेड (ता. शिरूर) येथील दत्तवाडी येथे गुरुवारी (दि. 4) सकाळी सहा वाजता बिबट्याने एका कालवडीवर हल्ला केला. या हल्ल्यात कालवड गंभीर जखमी झाली असून बिबट्यांचे पाळीव प्राण्यावरील हल्ल्याच्या घटनांमुळे शेतकर्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. वनविभागाकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने बेट भागातील नागरिक वनविभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.
दत्तवाडी येथे पिंपरखेड-जांबुत रस्त्याच्या कडेला गुरुवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास शेतकरी कांताराम ज्ञानेश्वर टाकळकर यांच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला केला. या वेळी टाकळकर यांनी आरडाओरडा करत बिबट्याला हाकलून लावले. या हल्ल्यात कालवडीच्या मानेला गंभीर जखम झाल्याचे टाकळकर यांनी सांगितले. पूर्वी दबा धरून येत असलेला बिबट्या धीटपणे मानवी वस्तीवर येत असून बिबट्याचा वाढता वावर हा धोक्याचा इशारा असतानाही वनविभाग याकडे पध्दतशीरपणे दुर्लक्ष करत असल्याचे पहायला मिळत आहे.
बुधवारी (दि. 3) रात्री नऊ वाजता गणेश चौक येथे लाईटच्या प्रकाशात बिबट्या रस्त्यावर अवतरला. शिकारीच्या शोधात आलेला या बिबट्याला श्रीराम दाभाडे, सोपान दाभाडे, चांगदेव दाभाडे, नामदेव दाभाडे यांनी फटाके वाजवून पळवून लावले. आठ दिवसांत बिबट्या दुसर्यांदा आल्याचे दाभाडे यांनी सांगितले.
बिबट्यांचा मानवी वस्तीवरील वावर आणि हल्ल्याच्या घटनांमुळे जनावरांसाठी सुरक्षित उपाययोजना करूनही बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव प्राणी ठार होत आहेत. परिणामी शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
हेही वाचा :