पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशाचा आणि स्वत:चा विकास करण्यासाठी नव्या पिढीने इंग्रजी शिकणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच इंग्रजी शिकण्याकडे लक्ष द्यावे. हिंदी, उर्दू या भाषांमधून ज्ञान मिळतेच परंतु, जागतिक भाषा असलेली इंग्रजीही अवगत होणे आवश्यक आहे. इंग्रजी शिकणे म्हणजे देशद्रोह नाही, असे मत सच्चर समितीचे सचिव अबूसालेह शरीफ यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
'हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्युट'तर्फे नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृह येथे दोन दिवसीय मुस्लिम शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. या वेळी, माजी खासदार हुसेन दलवाई, राज्याच्या अल्पसंख्याक विभागाच्या निवृत्त सहसचिव ऐनुल अत्तार, सामाजिक कार्यकर्ते अनव राजन, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे कार्यकारी अध्यक्ष शरद जावडेकर, हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्युटच्या अध्यक्षा इला दलवाई या वेळी उपस्थित होते. शरीफ म्हणाले की, पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञान मिळते, त्यामुळे आपल्या आई-वडिलांप्रमाणेच पुस्तकांचा सन्मान केला पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये विज्ञानाने मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे.
त्यामुळे आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण कमी पडू नये म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाला जात, धर्म, भाषा, श्रीमंत, गरीब हे कळत नाही. त्यामुळे आगामी काळात शिक्षण क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तर, भारतातील मुस्लिमांना आरक्षण, संरक्षण आणि शिक्षण हा तीन गोष्टी मिळल्याच पाहिजे. या तीन गोष्टी मिळविण्यासाठी समाजाने एकत्रित प्रयत्न करणेही गरजेचे आहे. श्रीमंत मुस्लिमांची मुले दर्जेदार शाळेत, तर गरिबांची मुले मदरशांमध्ये शिक्षण घेत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे आता मुस्लिम समाजातील मुलांनी शिक्षण घेऊन प्रगती केली पाहिजे. असे मत हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले.
हेही वाचा