तरुणाईला आता गरज सायबर संस्कारांची : आयटीतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर | पुढारी

तरुणाईला आता गरज सायबर संस्कारांची : आयटीतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : तीस-चाळीस वर्षांपूर्वी ठरावीक वर्गच संगणकाचा वापर करत होता. परंतु सध्या संगणक वापर सगळीकडे सर्वमान्य झाला आहे. त्यामुळे भारत जगात डिजीटल उपकरणे वापरण्यात अग्रेसर आहे. सध्या अनेकांकडे उपकरणे आहेत. परंतु ती कशी वापरावीत याचे प्रशिक्षण त्यांना कोणीही देत नाही. त्यामुळे तरुणाईला आता सायबर संस्कारांची गरज असल्याचे स्पष्ट मत आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी संगणक साक्षरता दिनाच्या पार्श्वभूमीवर दैनिक ‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

नियमांची आवश्यकता

डॉ. शिकारपूर म्हणाले, संगणक किंवा मोबाईल कसा वापरावा याचे कोणतेही प्रशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे अनेकजण स्वप्रशिक्षितच असतात. परंतु हे स्वप्रशिक्षण फसवे असू शकते. यातून अनेकजण सायबर गुन्ह्यांना बळी पडलेले पाहायला मिळतात. या क्षेत्रात काही नियमांची आवश्यकता आहे. उदा. मोबाईल वापरण्यासाठी देखील किमान 20 तासांचा अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. यामध्ये कोणत्या वेबसाईटचा वापर करावा, काय पाहू नये, वेगवेगळ्या बेटिंग अ‍ॅपचा वापर करावा का, मोबाईलवर किती वेळ गेम खेळावी यांसह सजग साक्षर होण्यासाठी आवश्यक बाबींचा समावेश असणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांनी काय करावे ?

संगणक क्षेत्रात विविध गोष्टींवर संशोधन सुरू आहे. अनेक गोष्टींमध्ये अ‍ॅटोमेशन हा प्रकार येईल. सर्व गोष्टी सॉफ्टवेअर आणि संगणकाच्या माध्यमातून होतील. यासाठी विद्यार्थ्यांनी नवनवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती जोपासायला हवी. पुणे शहरामध्ये शेती नाही तरीदेखील शेतीसंदर्भातील शिक्षण देणारी संस्था आहे. ज्याठिकाणी आयटी उद्योग आहेत. त्याठिकाणीच आयटीचे शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्याठिकाणी ज्याप्रकारचे उद्योग आहेत, तशाच प्रकारचे शिक्षण दिले गेले तर ते फायदेशीर ठरणार आहे.

सॉफ्टवेअर, हार्डवेअर, नेटवर्किंग

संगणकाचे तंत्रज्ञान तीन भागांमध्ये असते. यामध्ये सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि नेटवर्किंगचा समावेश आहे. या तिन्ही भागांमध्ये अतिशय वेगवान प्रगती होत आहे. येत्या काही दिवसांमध्ये आपल्याकडे फाईव्ह जी तंत्रज्ञान येत आहे. तर दर तीन वर्षांनी त्यात एका जीची भर पडणार आहे. त्यामुळे अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी शक्य होणार आहेत. मोबाईल आणि डेस्कटॉपऐवजी तेच तंत्रज्ञान एखादा चष्मा किंवा घड्याळतही पुरेसे सामावेल. आभासी प्रतिमा आणि मेटाव्हर्समुळे हार्डवेअर उद्योगाचे स्वरूप बदलणार आहे. यातून वृध्द आणि दिव्यांगांना तंत्रज्ञानाचा वापर सोपा होणार आहे. त्यामुळे युजर्सची संख्या वाढणार आहे. सॉफ्टवेअर विकत घेण्याची प्रक्रिया बदलणार आहे. या पुढील काळ हा आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा असणार आहे. यातून लोकांचे जीवन समृध्द होणार आहे. यातून काही रोजगार गेले तरी नवी रोजगार निर्मितीदेखील होणार आहे.

डिप फेक आहे तरी काय ?

डिप फेक व्हिडीओमध्ये आर्टिफिशीयल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्याची कृती, चेहरा आणि आवाज यांचे एकत्रिकरण करून बनावट व्हिडीओ तयार केला जातो. यामध्ये संबंधित व्यक्तीचा कोणताही सहभाग नसतो. इंटरनेट भौगोलिक सीमा मानत नाही. त्यामुळे फेक व्हिडीओ परदेशात कोणी तयार केले तर गुन्हेगार सापडू शकत नाहीत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येऊन कायदे करणे गरजेचे आहेत. गुन्हेगारांचे हस्तांतरण होणे गरजेचे आहे.

चॅट जीपीटी म्हणजे काय ?

या टूलचा वापर करून साहित्यनिर्मिती करता येते. हव्या त्या कवितादेखील करता येतात. कारण आर्टिफिशीयल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून यामध्ये कंटेटची निर्मिती झाल्याचे दिसून येते. प्रादेशिक भाषांमध्ये सध्या चॅट जीपीटीचा वावर मर्यादित आहे. इंग्रजीमध्ये सध्या याचा मोठा वापर होत आहे, प्रादेशिक भाषेतदेखील वापर वाढणार आहे. यातून अनेक गुंतागुंतीची आव्हाने निर्माण होणार असल्याचेदेखील डॉ. शिकारपूर यांनी नमूद केले.

हेही वाचा

Back to top button