

खडकवासला: पुणे शहर व परिसरासह जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तनाचे पाणी 1103 क्युसेक वेगाने पूर्णक्षमतेने सोडले जात आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांत धरणसाखळीत 0.81 इतकी पाण्याची घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणसाखळीत 0.76 टीएमसी इतका जादा पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 27 फेबुवारी 2026 रोजी खडकवासला धरणसाखळीत 17.20 टीएमसी म्हणजे 59.00 टक्के इतका पाणीसाठा होता, तर यंदा आजच्या दिवशी 27 फेबुवारी रोजी 17.96 टीएमसी म्हणजे 61.61 टक्के इतका पाणीसाठा आहे.
17 फेबुवारीपासून खडकवासला धरणातून मुठा कालव्यात पूर्णक्षमतेने पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासलापासून 202 किलोमीटर अंतराच्या मुठा कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेवटच्या टोकाला पाणी पोहोचल्याचे खडकवासला धरण जलसंपदा विभागाच्या शाखा अभियंता गिरिजा कल्याणकर यांनी सांगितले.
हवेली, दौंड, इंदापूर आदी तालुक्यांतील हजारो हेक्टर शेतीला उन्हाळी आवर्तनाचे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी खडकवासला धरणातून मुठा कालव्यात पाणी सोडण्यात येत असल्याने मुठा कालवा दुथडी भरून वाहत आहे. याशिवाय पुणे शहर व परिसराला पिण्यासाठी पूर्णक्षमतेने पाणी सोडण्यात येत आहे.
त्यामुळे धरणसाखळीतील पाणीसाठ्यात घट सुरू आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती तसेच येथील लाखो रहिवाशांसह व पुणे शहर व परिसरास जवळपास एक कोटी नागरिकांची तहान खडकवासला धरणसाखळीतील पानशेत, वरसगाव, खडकवासला व टेमघर या चार धरणांतून भागवली जात आहे. खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता 29.15 टीएमसी इतकी आहे. रब्बी आवर्तनाचे पाणी 10 फेबुवारी रोजी सोडणे बंद करण्यात आले.
या कालावधीत 3.77 टीएमसी इतके पाणी सोडले. खडकवासला धरणसाखळीतील टेमघर धरण 33.71 टक्के, वरसगाव धरण 63.65 टक्के, पानशेत धरणात 71.12 टक्के तर खडकवासला धरणात 49.42 टक्के इतका पाणीसाठा आहे. उन्हाळ्यात पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.