पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा : ऐन पावसाळ्यामध्ये पावसाने पाठ फिरवली असून, सध्या उन्हाच्या झळांनी पिके कोमेजून जात आहेत. त्यातच आता विजेच्या अतिरिक्त भारनियमनाने पिके जळून जाण्याची शक्यता आहे. परिणामी बळीराजा हवालदिल झाला आहे. वरुणराजाची अवकृपा सुरू असताना पाणी असूनही विजेच्या भारनियमनामुळे पिकांची तहान भागवणे अवघड झाले आहे. शेतातील उभ्या पिकांची होरपळ होण्यापूर्वी वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.
पिंपरखेड, जांबूत येथील वीज उपकेंद्रांना आंबेगाव तालुक्यातील काठापूर येथील वीज केंद्रातून वीजपुरवठा होतो. गेले काही दिवसांपासून तापमानात वाढ होऊन विजेची मागणी वाढल्याने महावितरण कंपनीकडून पूर्वसूचना न देता अचानक भारनियमन केले जात आहे. सध्या पाऊस नसल्याने पिके कोमेजू लागली आहेत. पाणी दिल्यानंतरही कडक उन्हामुळे पिके तग धरत नाहीत. शेतीपंपांना 8 तासांपैकी दोन – तीन तास वीजपुरवठा होत आहे, तर त्यात विजेच्या तांत्रिक अडचणी, लंपडाव यामुळे पिकांची तहान भागवणे अवघड झाले आहे. परिणामी जनावरांची चारा पिके, ऊस, मका तसेच मलचिंगचा वापर करून घेतलेल्या टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर व पालेभाज्या जळून जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :