पारगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अद्यापही पावसाने समाधानकारक हजेरी लावलीच नाही. त्यामुळे आता पिके धोक्यात आली आहेत. शेती पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी अक्षरश: धडपड करताना दिसत आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात यंदा पावसाने दडी मारली आहे. जुन, जुलै हे महिने कोरडेच गेले. परिसरात जेमतेम रिमझिम पाऊस पडला.
सद्य:स्थितीत विहिरी, पाझर तलाव, ओढे-नाले कोरडेठाक पडले आहेत. पिकांना पाण्याचा ताण बसू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिकांना पाणी कमी मिळत असल्याने उत्पादनातदेखील घट होण्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. सध्या पिके वाचवण्यासाठी शेतकरी विहिरींमध्ये इतर ठिकाणांवरून पाणी आणून साठा करताना दिसत आहेत. जमिनींमध्ये बोअर मारून पाण्याचा शोध घेताना दिसत आहेत.
हेही वाचा