कडूस : पुढारी वृत्तसेवा
कडूस (ता. खेड) परिसरात झालेल्या अवकाळी झालेल्या पावसाने कांदा पिक वाया गेले असून, कडूस बंदावणे शिवार येथिल शेतकरी विठ्ठल धर्मा बंदावणे यांनी कांदा पिकात मेंढरे सोडली आहेत.
परिसरातील शेतकरी बांधवांनी चांगल्या उत्पन्नाच्या आशेने कांदा पिकाची जोपासना केली होती. परंतु, अवकाळी पावसाने त्यावर पाणी पडले. परिणामी, काळजावर दगड ठेवून जड अंतःकरणाने शेतकऱ्यांनी कांदा पिकात मेंढरे सोडली. भविष्यकाळात कांदा पिकातून कर्ज फेडू, मुलांचे शिक्षण करू, घरातील व्यक्तीचे लग्न करू अशी स्वप्ने उराशी बाळगून बसलेल्या शेतकरी बांधवांच्या स्वप्नांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
कडूस बंदावणे शिवार परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पिक पिवळे पडून पिकांच्या शेंड्याना पिळे गेले आहेत. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला असून, चार महिने पीक जोपासून उत्पन्नात घट होण्यापेक्षा आताच पीक शेतातून काढून फेकून देत शेत दुसऱ्या पिकासाठी तयार करणे शेतकऱ्यांनी पसंत केले आहे.
शेतकऱ्यांचा आर्थिक स्रोत कांदा पिकावर अवलंबून आहे. मात्र, यावर्षी अवकाळी पावसाने पिकांना झोडपले. त्यात कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. अगोदरच्या सतत ढगाळ वातावरण व धुक्यामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता.त्यामुळे मागील आठवड्या बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा पिकांत ट्र'क्टर फिरवला होता.
हेही वाचा