![पावसाळ्यात जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मावळातील शेतकर्यांनी त्याची साठवणूक करून चारा झाकून ठेवला. आहे.](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F05%2Fmaval.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा
मावळ तालुका हे भाताचे कोठार समजले जाते. या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होते. त्यामुळे येत्या काही दिवसात पावसाळा सुरु होईल, या शक्यतेने शेतीतील मशागतीची तसेच जनावरांसाठी चारा साठवणीच्या कामात बळीराजा व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
साधारणत: जूनच्या दुसर्या आठवड्यामध्ये मान्सूनचे आगमन होते.
या पावसाच्या शक्यतेवर मावळातील बळीराजा पीक पेरणीसाठी शेत जमीनीची मशागत करून ठेवतो. यामध्ये नांगरट करणे, औत धरणे, जमिनीचे सपाटीकरण करणे, बांध बदिस्ती करून घेणे, शेतातील तण काढणे इत्यादी मान्सूनपूर्व कामे शेतकरी उरकून घेतात.
मावळात पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेक शेतकरी भात पीक घेतात.
त्यासाठी पाऊस पडण्यापूर्वी भाताची रोपे तयार करावी लागतात. तसेच भात पिकासाठी जमीन तयार करावी लागते. या कामांसाठी शेत मजुरांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते; मात्र सध्या मजूर मिळत नसल्याने शेतकर्यांना नाइलाजास्तव अधिकचे पैसे मोजून यंत्राद्वारे भात पिकासाठी जमीनीची तयारी करावी लागत असल्याचे परिसरातील शेतकरी सांगतात.
तालुक्यात पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात होत असल्याने ऐन पावसाळ्यात जनावरांना चारा मिळणे कठीण होवून जाते. त्यासाठी जनावरांच्या चार्याची सोय करून ठेवावी लागत असते. त्यामुळे अनेक शेतकरी चार्याची साठवणूक करण्याच्या कामात तसेच तो चारा पावसामुळे खराब होवू नये म्हणून प्लास्टिकचे मोठेे कागद टाकून झाकून ठेवण्याच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र मावळ परिसरात दिसून येत आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर पेरणीसाठी धावपळ होवू नये म्हणून त्यासाठी आवश्यक बी-बियाणे तसेच खते घेण्यासाठी शेतकरी बी-बियाणे विक्रीच्या दुकानात गर्दी करत आहेत.
हे ही वाचा :