

पुणे : सध्या सिंहगड परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. अतिवृष्टीचा धोका पुढील काही दिवस राहणार असल्याने सिहगड किल्ल्यावर नागरिकांना काहीकाळ प्रवेश न देण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. ही माहिती वनविभागाने मंगळवारी (दि.२७) प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
वनविभागाने काढलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, हवामान विभागाने पावसामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि गुरुवारी २९ मे रोजी होणाऱ्या आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने सिंहगड किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे. यामध्ये ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांनाही बंदी घालण्यात आली असून कल्याण दरवाजा, आतकरवाडी तसेच इतर सर्व पायी मार्गांनी प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आलेली आहे. सर्व नागरिकांनी सहकार्य करून प्रशासनास मदत करावी, असे आवाहनही वनविभागाने पत्रकाद्वारे केले.