

मंचर: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा परिणाम आता पोल्ट्री व्यवसायावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. ओमान तसेच इतर अरब देशांमध्ये भारतातून मोठ्या प्रमाणात अंडी निर्यात केली जात होती. मात्र, युद्धामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. यामुळे अंड्यांची निर्यात मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात अंड्यांचा साठा वाढू लागला आहे. त्याचा थेट परिणाम बाजारभाव घसरणीवर झाल्याचे दिसून येते.
युद्धापूर्वी अंड्याचा होलसेल दर साधारणपणे पाच ते साडेपाच रुपये होता. मात्र, सध्या निर्यात कमी झाल्यामुळे अंड्याचा होलसेल दर चार रुपये सत्तर पैशांपर्यंत खाली आला आहे. दुसरीकडे अंडी उत्पादनासाठी कोंबड्यांचे खाद्य, औषधे आणि देखभाल यावर खर्च वाढत आहे. एका अंड्याचा उत्पादन खर्च साधारण चार ते साडेचार रुपये येत असल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांनी सांगितले.
दर घसरल्यामुळे अनेक पोल्ट्री शेतकऱ्यांना नफ्याऐवजी तोट्याचा सामना करावा लागत आहे. उत्पादन सुरू असताना निर्यात कमी झाल्याने स्थानिक बाजारावर दबाव वाढत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय सध्या फारसा नफा देणारा राहिला नसल्याची भावना अंडी उत्पादक शेतकरी गोविंद थोरात, निकेतन दैने, माया शंकर थोरात यांनी व्यक्त केली.
युद्धपरिस्थिती लवकर शांत होऊन निर्यात पुन्हा सुरू झाली तरच पोल्ट्री उद्योगाला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे निरगुडसर येथील उर्जा फूड्स प्रा. लीचे प्रमोद हिंगे पाटील यांनी स्पष्ट केले.
पूर्वी निर्यात चांगली असल्यामुळे अंड्यांना चांगला दर मिळत होता. आता निर्यात घटल्याने बाजारात पुरवठा वाढला आहे. खर्च वाढत असताना दर कमी झाल्याने पोल्ट्री व्यवसाय टिकवणे कठीण होत आहे.
शफीभाई मोमीन, आंबेगाव ॲग््राो, शिनोली