![नवी सांगवी : अग्निशमन केंद्राअभावी वेळेत मिळेना मदत](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F12%2F%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%B2.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवी सांगवी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपळे गुरव, नवी सांगवी येथील परिसर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. परंतु, परिसरात अग्निशमन केंद्र नसल्यामुळे आगीच्या घटनेमध्ये नुकसान जास्त होत आहे. त्यामुळे परिसरात अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी केली जात आहे. बहुमजली इमारती व व्यावसायिकांनी येथील परिसराला प्राधान्य दिल्याने या परिसराचा विकास झाला आहे; परंतु येथील बहुमजली इमारती अथवा व्यावसायिक दुकानांमध्ये एखादी आगीची घटना घडली तर मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या भागात अग्निशमन केंद्र उभारावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
सांगवी, पिंपळे गुरव, नवी सांगवी पूर्वी गावे होती. सध्या येथील परिसरातील लोकसंख्या वाढली असून, टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. हा परिसर भौतिक सोयीसुविधांनी सोयीयुक्त आहे. परंतु, या परिसरात अग्निशमन केंद्र नसल्याने एखादी दुर्घटना घडली तर येथील रहिवासी व व्यावसायिकांना इतर ठिकाणच्या अग्निशामक केंद्रांवर अवलंबून राहवे लागत आहे. पिंपरी, रहाटणी, संत तुकारामनगर आदी ठिकाणांहून अग्निशामक दलाला पाचारण करावे लागते. यामध्ये वेळ खूप जातो.
हीच घटना सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत घडल्यास वाहतूककोंडीमुळे अग्निशामक दलाच्या जवानांना येण्यास खूप वेळ लागत आहे. या वेळेत दुकान किंवा घरातील सामग्रीचे मोठे नुकसान होते. त्यामुळे या परिसरात अग्निशमन केंद्र उभारल्यास आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवणे सोपे होणार आहे.
पिंपळे, गुरव, सांगवी परिसरात अग्ग्निशमन केेंद्र नसल्यामुळे परिसरात एखादी आगीची घटना घडल्यास पिंपरी, रहाटणी आदी ठिकाणाहून अग्निशामक दलाला पाचारण करावे लागते. त्यामुळे वेळ वाया जात असून, यामुळे नुकसान जास्त होत आहे. त्यामुळे परिसरात केेंद्र उभारावे.
– एक नागरिक
हेही वाचा