पुणे : पुढारी वृत्तसेवा
सातारा जिल्हा आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गाळपाविना मोठ्या प्रमाणात ऊस उभा आहे, त्यामुळे संपूर्ण उसाचे गाळप होईपर्यंत कारखाने बंद करण्यात येऊ नयेत, आशा सक्त सूचना जिल्ह्यातील साखर कारखान्यांना देण्याची मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे.
शुक्रवारी (दि.६) दुपारी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतत्यांनी मागण्यांचे निवेदन दिले आणि सविस्तर चर्चाही केली. ऊस उत्पादकांचा ऊस शेतात उभा असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून तो आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे गळीत हंगाम 2021- 22 अखेरीस सुरुवात होवूनही ऊस तुटून जात नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना संपूर्ण ऊस तुटून जात नाही तोपर्यंत साखर कारखाने बंद करण्यात येऊ नयेत, यासाठी सक्त सूचना देण्यात याव्यात. तसेच कोणत्याही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गाळपाविना शेतात उभा राहू नये याची दक्षता साखर आयुक्तांनी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.
चर्चेनंतर याबाबत माहिती देताना साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, सातारा जिल्ह्यातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील जो ऊस शेतात उभा आहे, त्याच्या गाळपाचे नियोजन केलेले आहे. साधारणत: आठ गावांमधील ऊस उभा असून काही ठिकाणी तोडणीस आजपासून सुरुवात झालेली आहे. राज्यात कोणत्याच शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहणार नाही असे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.