पुणे : पुढारी वृत्तसेवा : मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या, लसीकरण आणि नसबंदी प्रक्रियेची संथ गती, शासनाची उदासिनता अशा कारणांमुळे राज्यात श्वानदंशाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या चार वर्षांमध्ये श्वानदंशाच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. 2023 मध्ये रेबिजमुळे 29 मृत्यू; सर्वाधिक 80,282 श्वानदंशाच्या घटना ठाणे जिल्ह्यात झालेल्या आहेत. दरम्यान, शासन याबाबत काय पावले उचलणार की केवळ बघ्याची भूमिका घेणार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. काही वर्षांपूर्वी भटक्या कुत्र्यांना महापालिकेच्या गाड्यांमधून उचलून नेले जात असे.
कायद्यात बदल झाल्यावर आणि प्राणीप्रेमींचा दबाव वाढल्यावर मोकाट कुत्र्यांना पकडून, त्यांचे लसीकरण करुन पुन्हा पूर्वीच्या जागेवर सोडले जाते. लसीकरण झालेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने थेट रेबीज होत नसला तरी सौम्य ते मध्यम स्वरुपाच्या जखमा होतात.
लसीकरणात वाढ केली जात असल्याचा दावा शासनाकडून केला जात असला तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. श्वानदंशाच्या घटनांमध्ये आणि रेबीजमुळे होणा-या मृत्यूमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे शासन याबाबत काय पावले उचलणार की केवळ बघ्याची भूमिका घेणार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 2023 मध्ये श्वानदंशाच्या सर्वाधिक घटना ठाणे जिल्ह्यात घटल्या असून, ते प्रमाण 80,282 इतके आहे. त्यापाठोपाठ, बृहन्मुंबई महानगरपालिका (75,288), अहमदनगर (72,446), कोल्हापूर (58,873), सातारा (45,860) या जिल्ह्यांमध्ये श्वानदंशाचे प्रमाण दिसून येत आहे.
हेही वाचा