

मंचर: आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभेे) धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने जलाशयाखाली गेलेल्या जुन्या आंबेगावच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. अनेक वर्षांपासून पाण्याखाली असलेले प्राचीन जैन मंदिर, घरांचे अवशेष, वाड्यांच्या जागा आणि जुन्या वस्तीच्या खुणा आता स्पष्टपणे दिसू लागल्या आहेत. त्यामुळे विस्थापित कुटुंबीय आणि त्यांच्या पुढील पिढ्या मूळ गावचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येथे भेट देत आहेत.
डिंभे धरणाच्या उभारणीसाठी आंबेगावसह अनेक गावे भूसंपादनात गेली होती. त्यानंतर संबंधित कुटुंबांचे पुनर्वसन विविध ठिकाणी करण्यात आले. काळाच्या ओघात गाव जलाशयाखाली गेले असले, तरी त्या गावशी निगडित आठवणी आजही अनेकांच्या मनात जिवंत आहेत.
जलाशयातील पाणी कमी झाल्याने जुने मंदिर आणि घरांचे अवशेष उघडे पडताच अनेक जण आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येथे येत आहेत. जुन्या घरांची जागा शोधताना, शाळेचा परिसर ओळखताना किंवा मंदिराच्या अवशेषांकडे पाहताना अनेकांच्या डोळ्यांत नकळत अश्रू दाटून येत आहेत.
काही जण आपल्या मुलांना आणि नातवंडांना मूळ गावची ओळख करून देत आहेत. विकासासाठी दिलेल्या त्यागाची साक्ष देणाऱ्या या खुणा आजही विस्थापितांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे.
धरणासाठी गाव सोडावे लागले आणि अनेक जण विस्थापित झाले. पाणी ओसरल्यानंतर घरांची जागा, मंदिर आणि जुन्या खुणा पाहताना बालपणीच्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या आहेत, असे चांडोलीतील उद्योजक मोहन थोरात यांनी सांगितले.