

पुणे: पुढारी वृत्तसेवा
सध्या धकाधकीच्या काळात प्रत्येकाला बाजारात जाऊन भाजी आणणे, स्वच्छ करणे मग त्याचा वापर स्वयंपाकासाठी करणे, या गोष्टींसाठी पुरेसा वेळ नसतो. त्यातच 'रेडी टू सर्व्ह' आणि 'पॅक्ड फूड' खाण्याचे प्रमाणही वाढत आहे. यामुळेच वाळवलेल्या भाज्यांचा वापर जास्त प्रमाणात होताना दिसून येत आहे.
प्रत्येक भाजीमध्ये पाणी आणि ओलावा असतो. जोपर्यंत भाजीत पाणी असते, तोपर्यंत भाजी टवटवीत राहते. पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागले की भाजी सुकून जाते. परंतु भाज्या वाळवण्यासाठी एका ठराविक प्रक्रियेचा वापर केल्यास, भाजीतील ओलावा जातो आणि भाजी जास्त काळ टिकते. यासाठी आधी या भाज्या स्वच्छ धूवून, कापून मग अर्धवट शिजवल्या जातात. त्यानंतर त्यांना उन्हात वाळविले जाते. ज्यामुळे या भाज्या जास्त दिवस टिकतात आणि त्यांचा आकार कमी झाल्याने कमी जागेत जास्त भाज्या साठवून ठेवता येतात.
प्रामुख्याने मटार, गाजर, मेथी, कोथिंबीर, कांदा टोमॅटो, मिर्ची, लसूण, मका, बीट, ढोबळी मिर्ची, पुदीना, मशरुम या भाज्या वाळवल्या जातात. किराणा दुकानांमध्ये या भाज्या ग्रॅमस्मध्ये विकल्या जातात. या भाज्या शिजवण्यासाठी वेळ आणि इंधन ही कमी लागते. याच भाज्या नूडल्स, पास्ता, सूप यासारख्या पॅक्ड फूड मध्ये वापरल्या जातात.
ग्रामिण भागातील लोकांना यामुळे उत्पन्नाचा नविन मार्ग मिळाला असून, बऱ्याच ठिकाणी स्त्रिया हा व्ययसाय करताना दिसत आहेत. विविध कंपन्या या वाळवलेल्या भाज्या विकत घेतात. ज्याच्या बदल्यात या लोकांना चांगली किंमत मिळत आहे.