

उमेश कुलकर्णी
दौंड : नगरपालिकेची निवडणूक मंगळवारी (दि. 2) शांततेत पार पडली. संपूर्ण प्रचारकाळात आरोप-प्रत्यारोपांची मालिका झडत राहिली. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या वतीने दुर्गादेवी जगदाळे, भाजपा पुरस्कृत नागरिक हित संरक्षण मंडळाकडून मोनाली वीर, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने कोमल बंड हे प्रमुख उमेदवार होते. सर्व उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले असून, निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. ही निवडणूक स्थानिक असली तरी यामध्ये आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
या निवडणुकीवर आमदार राहुल कुल, नागरिक हित सरंक्षण मंडळाचे प्रेमसुख कटारिया, माजी आमदार रमेश थोरात व दौंड शुगरचे ज्येष्ठ संचालक वीरधवल जगदाळे यांच्या राजकीय प्रभावाची छाप दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी 25 जागांवर उमेदवार दिले. नागरिक हित संरक्षण मंडळाने सर्व जागांवर उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष फक्त 18 जागांवर उमेदवार उभे करू शकले. शिवसेना (उबाठा) पक्षाकडून एका जागेवर उमेदवारी देण्यात आली, तर आम आदमी पक्षाने येथे नगरसेवक पदासाठी 7 जणांना उमेदवारी दिली होती.
दौंड नगरपालिकेत 50 हजार 490 मतदार असून, यांपैकी 29 हजर 951 मतदारांनी मतदान केले. मतदानाचा टक्का 59.32 नोंदवला गेला. मागील पंचवार्षिक तुलनेत यंदाचे मतदान कमी झाल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. प्रचारदरम्यान एका भागात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे कार्यकर्ते आणि आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांमध्ये किरकोळ चकमक झाली होती. वेळीच वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप झाल्याच्या चर्चा शहरात जोरदार सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व नागरिक हित संरक्षण मंडळ या दोन्ही गटांकडून पैशांचे वाटप झाल्याची चर्चा शहरात आहे. काही प्रभागांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडूनदेखील अल्प प्रमाणात पैसे वाटप केल्याच्या चर्चा आहेत. एवढे खुलेआम वाटप झाल्याचे बोलले जात असूनही एकाही गटाने औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार एका प्रभागाची निवडणूक 20 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे अंतिम निकालासाठी नागरिकांना आणि उमेदवारांना काही दिवस अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु एकूणच या निवडणुकीत आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राष्ट्रीय पक्ष असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर लहान पक्षांनी निवडणूक लढवली असली तरी प्रमुख गटांच्या प्रचंड आर्थिक जोरासमोर ते हतबल दिसले. एवढ्या उघडपणे पैशांचे वाटप होत असूनही एकाही पक्षाने तक्रार नोंदवली नाही, ही बाब सर्वांना खटकणारी ठरली.
उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांनी निवडणुकीपूर्वी काही जणांना तडीपार केले जाईल, असे संकेत दिले होते. मात्र, प्रमुख कारवाया झाल्याचे विशेष दिसले नाही. त्यामुळेच ‘पोलिस यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करते का?’ असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आगामी काळात दोन गटांमध्ये हाणामाऱ्या होण्याची शक्यता असल्याने पोलिस प्रशासनाने सतर्क राहण्याची मागणीदेखील नागरिकांनी केली आहे.
मुख्य लढत : राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) विरुद्ध नागरिक हित संरक्षण मंडळ-भाजपा युती
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाची ताकद मर्यादित.
निकालाचे केंद्रबिंदू : कुल-जगदाळे-थोरात-कटारिया गटांची मते.
एक प्रभागाची निवडणूक : न्यायालयाच्या आदेशाने
20 डिसेंबर रोजी