पिंपरी : स्मार्ट सिटीला दररोज पाणीपुरवठा कधी?

पिंपरी : स्मार्ट सिटीला दररोज पाणीपुरवठा कधी?

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : स्मार्ट सिटी म्हणून नावलौकिक मिळविलेल्या पिंपरी-चिंचवडला गेल्या पावणेचार वर्षांपासून दोन दिवसांतून एकदा पाणी दिले जात आहे. ही शहरासाठी नामुष्कीची बाब आहे. दररोज पाणी द्या, अशी मागणी शहरवासीयांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, तांत्रिक कारण पुढे करून दिवसाआड पाणीपुरवठा धोरणाचे महापालिकेकडून समर्थन केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहर 181 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात वसले आहे. शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या आसपास आहे. शहरातील अनेक भागांत टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. झपाट्याने दाट लोकवस्ती वाढल्याने पाण्याची मागणी सतत वाढत आहे. शहरातील काही भागांत अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी जनसंवाद सभेत वारंवार केल्या जात आहेत. मात्र, पाणीपुरवठा विभागाकडून तक्रारी कमी झाल्याच्या दावा होत आहे.

दोन दिवसांतून एकदा पाणी मिळत असल्याने पुरेसा साठा न झाल्याने शहरातील काही भागांतील नागरिकांची गैरसोय होते. तांत्रिक बिघाड किंवा जलवाहिनी फुटल्याने पाणी न आल्याने सलग तीन दिवस पाणी न मिळाल्याने त्या भागांतील रहिवाशांची प्रचंड गैरसोय होते. ते धोरण बंद करून दररोज पाणी देण्याची मागणी वारंवार केली जात आहे. विशेषत: राजकीय पक्षांकडून तसेच, पदाधिकारी व माजी नगरसेवकांकडून तशी मागणी होत आहे. शहराला पाणी देणारे पवना धरण पूर्णपणे भरल्यानंतर या मागणीस अधिक जोर चढतो. मात्र, पालिका प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे आतापर्यंचा अनुभव आहे.

आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी मिळाल्यानंतर दरररोज पाणी दिले जाईल, असे अधिकार्‍यांकडून सांगितले जात होते. ते पाणी शहराला उपलब्ध झाले आहे. सध्या 100 एमएलडीऐवजी केवळ 50 एमएलडी पाणी उचलले जात आहे. दिवसाआड पाणीपुरवठा असेल तरच, संपूर्ण शहरात समन्यायिक पद्धतीने पाणीपुरवठा होऊ शकतो अन्यथा नाही, अशी ताठर भूमिका महापालिका प्रशासनाची आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या नशीबी दररोज पाणी मिळत नसल्याचे चित्र सध्या तरी आहे.

खासगी टँकर लॉबी पोसण्याचे महापालिकेचे उद्योग?

शहरातील अनेक हाऊसिंग सोसायट्यांना पाणी कमी पडत असल्याने ते खासगी टँकरद्वारे दररोज पाणी मागवितात. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्याने या टँकरची संख्या दुपटीने वाढते. खासगी टँकर लॉबी पोसण्यासाठी दररोज पाणी न देता महापालिकेकडून दिवसाआड पाणी दिले जात आहे, असे आरोप विरोधक सातत्याने करीत आहेत.

महापालिकेच्या उपाययोजना

निगडी-प्राधिकरण सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता 500 एमएलडीवरून 600 एमएलडी करण्यात येत आहे. रावेत अशुद्ध पाणी उपसा केंद्राची पंपिंग क्षमताही वाढविण्याचे काम सुरू आहे. शहरात नव्याने 29 उंच टाक्या बांधण्यात येत आहेत. गळती रोखण्यासाठी नव्याने जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले आहे. आंद्रा व भामा आसखेड पाणी प्रकल्पास गती देण्यासाठी स्वतंत्र समिती नेमली आहे. चिखली येथे 300 एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आला आहे.

निघोजे येथे इंद्रायणी नदीवर अशुद्ध जलउपसा केंद्र बांधण्यात आले आहे. पवना बंद जलवाहिनी हा रखडलेला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. जुन्या महामार्गावर निगडी ते दापोडी अशी मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. अभय योजनेस प्रतिसाद मिळत नसल्याने शहरातील अनधिकृत नळजोड शोधून ते अधिकृत केले जाणार आहेत. पाणी बिल वसुलीची जबाबदारी करसंकलन विभागाकडे सोपविण्यात आली आहे.

शहरातील सर्व भागांत पुरेसे पाणी

समन्यायिक पद्धतीने शहरातील उंच व सखल अशा सर्व भागांत दोन दिवसांचे पाणी एकदाच दिले जात आहे. नागरिकांच्या तक्रारी खूपच अल्प प्रमाणात आहेत. यावरून शहरात सुरळीतपणे व योग्य दाबाने पाणीपुरवठा होत आहे. शहरातील नागरिकांना दररोज प्रतिव्यक्ती 135 लिटर पाणी द्यावे, असा नियम असताना महापालिका तब्बल 200 लिटर पाणी देत आहे. तर, नव्याने तयार झालेल्या हाऊसिंग सोसायट्यांना प्रतिव्यक्ती पिण्यासाठी 40 लिटरऐवजी 90 लिटर पाणी दररोज दिले जात आहे. समन्यायिक पद्धतीने पाणी देण्यासाठी दिवसाआड पुरवठा करण्यात येत आहे. त्यात बदल केल्यास पाणीपुरवठा व व्यवस्थापन बिघडू शकते, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.

चार वर्षांपासून दोन दिवसांतून एकदा पाणी

शहरात 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. चार वर्षांपासून दोन दिवसांतून पाणी दिले जात आहे. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हे धोरण सुरू केले. त्यानंतर राजेश पाटील व सध्याचे शेखर सिंह हे दोन आयुक्त आले. मात्र, दोन दिवसांतून पाणी देण्याचे धोरण त्यांनीही कायम ठेवले आहे.

महापालिकेचे अपयश

पवना बंद जलवाहिनी प्रकल्प पूर्ण करणे
आंद्रा आणि भामा आसखेड धरणांत 267 एमएलडी पाणी शहरात आणणे
महापालिकेच्या मैलासांडपाणी प्रकल्पांतील पाण्याचा पुनर्वापर करणे
सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प कागदावरच
संपूर्ण शहरात प्रक्रिया केलेल्या पाण्याचे वितरण करणे
मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांत सांडपाण्याचा पुनर्वापर प्रकल्पाद्वारे वापर
नळजोडास स्मार्ट पाणी मीटर बसविणे
100 गळती व पाणी चोरी रोखणे
अनधिकृत नळजोड बंद करणे

शहराला दिले जाणारे पाणी

पवना धरण – 520 एमएलडी
आंद्रा धरण – 100 पैकी 50 एमएलडी
एमआयडीसी – 30 एमएलडी
एकूण – 600 एमएलडी

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news