आढळराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

आढळराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

मंचर : शिरूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केल्याने शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मार्ग सुकर असलेल्या चर्चेला उधाण आले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात लागोपाठ तीनवेळा शिवसेना पक्षाकडून चढत्या मताधिक्याने विजयी होऊन पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवारांच्या बालेकिल्लाला धक्का देण्याचे काम शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला.

मात्र, तरीदेखील आढळराव पाटील यांनी खचून न जाता गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे केली. कोरोना काळात आढळराव पाटील यांनी मतदारसंघात फिरत गरीब, गरजूंना आरोग्य सुविधा आणि किराणा देऊन त्यांच्या संसाराला हातभार लावण्याचे मोठे काम केले. दरम्यान, आठ ते दहा महिन्यांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आढळराव पाटील यांनी प्रवेश करून शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकासकामांचा धडाका सुरूच ठेवला आहे.

पुन्हा मीच उमेदवार असल्याने कोणत्या परिस्थितीत खासदारकी लढविणार आणि निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे ते वारंवार जाहीर कार्यक्रमातून सांगत आहेत. त्यामुळे त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. दरम्यान, भाजपच्या वतीने गेल्या तीन-चार वर्षांत शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदारकी लढवण्यासाठी आणि जिंकण्यासाठी केंद्रीयमंत्र्यांचे दौरे झाले, पक्ष संघटनेच्या बैठका झाल्या. त्या माध्यमातून भाजपनेही या मतदारसंघावर दावा केला असला, तरी आढळराव पाटील यांनी मात्र खचून न जाता त्यांनी आपला जनसंपर्क कायम ठेवला.

गेल्या दोन महिन्यांत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर भाजप पक्षाची जिल्ह्यात अजित पवारांच्या अगोदरची मजबूत संघटना असायची किंवा जे मेळावे वारंवार पाहिजे त्याला काही प्रमाणात खीळ बसली आहे. 'अजित पवार बोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाले' अशी परिस्थिती निर्माण झाल्याने भाजप पक्षाचे काही प्रमाणात अवसान गळाले.

त्यामुळे भाजप पक्षाप्रमाणेच एकनाथ शिंदे शिवसेना गटाचीही काही प्रमाणात तशीच अवस्था झाली; परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री झाल्याने जिल्ह्यात काही प्रमाणात उत्साह संचारला आहे. दोन दिवसांपूर्वी कर्जत येथील अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघासह बारामती आणि इतर दोन लोकसभा मतदारसंघावर दावा केला. त्यामुळे अर्थात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक शिवाजीराव आढळराव पाटील यांचे समर्थक संभ्रमात पडले आहे.

याबाबत एका राजकीय निरीक्षकाने सांगितले की, शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उत्तम जनसंपर्क आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची राज्यात सत्ता अर्थात आघाडी आहे. त्या माध्यमातून जागावाटप होईल आणि ही जागा अजित पवार म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जर येणार असेल, तर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून आपली उमेदवारी कायम ठेवावी. त्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थात अजित पवार गटालादेखील एक सक्षम उमेदवार मिळेल आणि आढळराव पाटील यांचा असलेल्या जनसंपर्काचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही होईल. या सर्व घडामोडीत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आजमावे लागेल. वळसे पाटील यांनी हिरवा कंदील दिला, तर आढळराव पाटील यांचा उमेदवारीचा मार्ग सुकर होण्यासाठी महत्त्वाची मदत होणार आहे.

अजित पवार गटाची ताकद मोठी

खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, आंबेगावचे आमदार सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांचाही फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला होणार आहे. या मतदारसंघात शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पाठोपाठ भाजप आणि एकनाथ शिंदे अर्थात, शिवाजीराव आढळराव पाटील यांचीही ताकद चांगल्या पद्धतीने आहे.

जुन्या मैत्रीला येईल अधिकच बहर

आढळराव पाटील यांना अजित पवार गटाने उमेदवारी दिल्यास आंबेगाव विधानसभा मतदारसंघात वळसे पाटील आणि आढळराव पाटील या दोघा जुन्या मित्रांच्या मैत्रीला अधिकच बहर येईल. आढळराव पाटील यांना खासदार केले जाईल आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आमदारकीला जातील. या दृष्टीने तालुक्यात असलेला राजकीय संघर्ष थांबेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक हक्काचा खासदार म्हणून आढळराव पाटील यांच्या माध्यमातून बळ मिळेल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news