भीमा नदीला येणार्या पुरामुळे होणारी हानी टाळण्यासाठी देश पातळीवरील तज्ज्ञांच्या सहभागाने विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. पुराच्या अनुषंगाने भीमा खोर्याचा अभ्यास पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे या समितीचा अहवालाला विशेष महत्त्व आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीचा फटका पंढरपूरसह आसपासच्या गावांना बसला होता. ही बाब लक्षात घेऊन भीमा खोर्याचा अभ्यास करण्यात येत आहे. त्यासाठी जलसंपदाचे निवृत्त सचिव राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये बारा सदस्यांचा समावेश आहे.
सह्याद्री पर्वताच्या रांगामध्ये सुमारे 6 हजार मिमी पाऊस पडतो. प्रामुख्याने डोंगररांगापासून पुढे 50 किलोमीटरपर्यंत पावसाचे प्रमाण असेच असते. त्यानंतर पुढे 25 किलोमीटरपर्यंत 600 मिमी इतका पाऊस पडतो. या सर्व बाबींचा अभ्यास करण्यात आला आहे. नदीच्या उगमापासून ते कर्नाटक राज्याच्या हद्दीपर्यंतची पुराची कारणे, परिणाम, आपत्ती टाळण्यासाठी कराव्या लागणार्या उपाययोजना ही समिती सूचविणार आहे. या समितीने भीमा नदीची प्रत्यक्ष पाहणी केली, तसेच नदीकाठच्या नागरिकांशी संवाद साधला.