

बारामती: प्रियकरासोबत विवाह निश्चित झाल्यानंतर त्याच्यासोबत फिरायला आलेल्या तरुणीला तरुणाने लैंगिक संबंधासाठी गोळ्या दिल्या. त्यातून या २३ वर्षीय मृत्यू झाल्याची धक्कादायक व खळबळजनक घटना बारामती शहरात घडली.
अथर्व राजेंद्र मेहन (वय २७, रा. बारामती) या तरुणाविरोधात या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तिच्या आईने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणीने बी. एस्सी. अॅग्रीचे शिक्षण पूर्ण केले होते. ती एमपीएससी परीक्षेची तयारी करत होती. त्यासाठी आॅक्टोबर २०२५ पासून तिने पुण्यात क्लास लावले होते. डिसेंबर २०२५ मध्ये तिचे अथर्वसोबत प्रेमसंबंध जुळले.
याची माहिती तिच्या मैत्रिणीकडून तिच्या आईला कळाली. त्यानंतर आईने मुलीशी नियमित संपर्क ठेवायला सुरुवात केली. ३० डिसेंबर रोजी आई व तिचा भाऊ पुण्याला गेले, त्यांनी या मुलीला बारामतीला आणले. तिने अथर्वसोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली देत तिच्याशी लग्न करण्याची इच्छा कुटुंबियांकडे व्यक्त केली. त्यानंतर दोन्ही कुटुंबात याबाबत चर्चा झाली. १२ एप्रिल २०२६ रोजी दोन्ही कुटुंबियांनी एकत्र बसत संमतीने विवाह निश्चित केला.
त्यानंत अथर्व व संबंधित तरुणी एकमेकांना भेटू लागले. विवाह निश्चित झालेला असल्याने दोन्ही कुटुंबियांनी त्यावर हरकत घेतली नाही. त्यांचा नियमित एकमेकांशी संपर्क होवू लागला. परंतु घटनेच्या १५ ते २० दिवस अगोदर तरुणीच्या वागण्यात बदल झाल्याचे आईच्या लक्षात आले. आईने तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली असता अथर्व हा तरुणीकडे शारिरिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह करत असल्याचे तसेच संबंधासाठी तिला काही गोळअया देत असल्याचे मैत्रिणीने सांगितल्याचा दावा आईने फिर्यादीत केला आहे.
घटनेच्या दिवशी ६ आॅगस्ट रोजी अथर्व याने कारमधून तिला एमबीएच्या प्रवेशासाठी बारामतीत एका काॅलेजवर आणले. दुपारी चारच्या सुमारास तरुणीने आईला प्रवेश फी बाबत मेसेज केला. तसेच अथर्वची आई व मावशी यांना सोडण्यासाठी आम्ही जात असल्याचे सांगितले. आईने व्हीडिअो काॅल केला असता तरुणी अथर्वसोबत कारमध्ये असल्याचे दिसून आले. सायंकाळी सातच्या सुमारास आईने तरुणीला फोन केला; मात्र तिने फोन उचलला नाही. त्यानंतर अथर्वच्या मोबाईलवर फोन केल्यानंतर आईचे तरुणीशी बोलणे झाले.
त्यावेळी अथर्व तिला घरी घेऊन जाणार असल्याचे, त्याला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे असल्याचे आणि तो तिला गोळी देणार असल्याचे तरुणीने सांगितल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. आईने तिला अथर्वच्या घरी जाऊ नये व तातडीने घरी परतावे, असे सांगितले. रात्री नऊच्या सुमारास आईने मेसेज केल्यावर तरुणीने जेवण करीत असल्याचे उत्तर दिले. त्यानंतर तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. रात्री दहाच्या सुमारास आईने फोन केला असता अथर्वने फोन उचलला. तरुणीला चक्कर आल्याचे सांगून तिला घेऊन येत असल्याचे त्याने कळविले.
काही वेळाने अथर्व तरुणीला घेऊन आईच्या घरी आला. तिला प्रथम बारामतीतील दोन खासगी रुग्णालयात नेले. तेथे दाखल करून न घेतल्यानंतर त्याने सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयात तिला नेले. रात्री १०.२० वाजता तिची आई तेथे पोहोचली असता तरुणी स्ट्रेचरवर होती. तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आईला कमालीचा धक्का बसला. मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत आईने या प्रकरणी फिर्याद दिली.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम व पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.