बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरातील रस्ते खड्ड्यात गेल्यानंतर अखेर या रस्त्यांना पॅचवर्क करण्यात आले. परंतु हे पॅचवर्क अत्यंत कुचकामी करण्यात आले आहे. खड्ड्यांच्या प्रश्नांवरून ओरड करणार्या नागरिकांची समजूत घालण्यासाठी हे पॅचवर्क करण्यात आले की काय, अशी शंका या कामामुळे निर्माण झाली आहे.
पावसाळ्यापूर्वीच शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपूर्वी शहरातील रस्त्याचे पॅचवर्क करण्यात आले. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. पॅचवर्क करताना डांबराचा नावालाच वापर केला गेला आहे. जे खड्डे बुजविण्यात आले आहेत, त्यातील खडी आता उखडून बाहेर आली आहे. त्यावरून दुचाकीस्वार घसरून अपघात घडू लागले आहेत.
बारामती शहरात सध्या विकासकामांचा झपाटा सुरू आहे. मात्र, शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले असून, याचा वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. यावर उपाय म्हणून नागरिकांच्या सोयीसाठी बारामती नगरपरिषदेने या खड्ड्यांच्या पॅचवर्कचे काम सुरू केले आहे. मात्र, हे काम करणार्या ठेकेदाराने पॅचवर्कचे काम निकृष्ट दर्जाचे करत असून, यासाठी वापरलेली खडी विखरून रस्त्यावर पसरल्याने व अंदाज न आल्याने महिला व वृद्ध दुचाकीस्वार घसरून पडत आहेत.
शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर, गल्लीबोळात, रिंगरोड व शाळेच्या परिसरात या पॅचवर्कचे असे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक
ठिकाणी पॅचवर्क करण्याआधी त्या खड्ड्यातील माती काढावी लागते. मात्र, तसे न करता त्यातच खडी टाकली गेली, वरून डांबर टाकल्यासारखे केले गेले. ही खडी खड्ड्यात बसलीच नाही. ती विखरून रस्त्यावर पसरली आहे. या ठेकेदाराच्या कामावर बारामती नगरपरिषदेच्या संबंधित खात्यांतर्गत अधिकार्यांचे लक्ष नसल्याने या निकृष्ट कामाचा बारामतीकरांना मनस्ताप सहन
करावा लागत असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले.
हेही वाचा