पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालानंतर आता महायुतीत खटके उडत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात अजित पवार यांना सोबत घेतल्यावरून भाजपला कानपिचक्या मिळाल्या होत्या. आता भाजप आमदारांमध्येही पवार गटात खदखद दिसत आहे.
अजित पवारांना सोबत घेतल्याने लोकसभेत फटका बसल्याचे भाजपच्या काही आमदारांचे मत आहे. अजित पवार गटाची मते भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचे भाजप आमदारांनी मत व्यक्त केल्याचे समजते. पराभवाचे खापर आता अजित पवार गटावर फोडण्यात येत आहे. भाजपसह शिंदे गटाला हा तिसरा मित्र उपयोगी ठरला नसल्याचा दावा करण्यात येत आहे. अजून याविषयी उघडपणे कोणी बोलले नाही. पण आरएसएसच्या मुखपत्रातून महायुतीमध्ये अजित पवार गटाला सहभागी करून घेतल्याप्रकरणात कान उपटण्यात आले आहे.
अजित पवार गटाची मते भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचा आरोप भाजप आमदारांनी केला आहे. त्यासाठी राज्यातील लोकसभा मतदारसंघांची यादीच समोर केली आहे. यामध्ये माढा, सोलापूर, दिंडोरी, मावळ, शिरूर आदी मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्येही बहुतेक ठिकाणी भाजप आणि शिंदेसेनेच्या उमेदवारांना फटका बसल्याचे चित्र आहे. इतर मतदारसंघांतही अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि नेते सक्रिय नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
शिरूर मधील खेड विधानसभा मतदार संघात दिलीप मोहिते- पाटील, जुन्नर – अतुल बेनके, आंबेगाव-दिलीप वळसे-पाटील आणि हडपसर येथे चेतन तुपे हे चारही आमदार असताना शिवसेनेचे आढळराव पाटील पराभूत झाल्याचे मत भाजप आमदारांनी व्यक्त केले आहे. या कारणामुळे अजित पवार यांना सोबत ठेवण्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
हेही वाचा :