नागपूर, पुढारी वृत्तसेवा: मविआत सर्वच पक्षांनी घेतलेल्या एकत्रित मेहनतीने महाराष्ट्रात चमत्कार घडला. महाविकास आघाडीचे नेते एकत्रित बसूनच लोकसभेप्रमाणेच विधानसभेचे सुध्दा तिकीट वाटप करतील. आमच्यात कोणीही मोठा भाऊ किंवा लहान भाऊ नाही, असे राष्ट्रवादी काँग्रस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी आज (दि.१८) स्पष्ट केले. ते माध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इतर मित्र पक्षांनी एकत्रिततपणे लढविली. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे नेहमी छोटा भाऊ मोठा भाऊ हा विषय छेडत असतात. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वच पक्षानी एकत्रितपणे चांगला समन्वय ठेऊन काम केले. सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रितपणे बसून मेरीटच्या आधारावर उमेदवार निवड करुन तिकीट दिले. सर्वच नेत्यांनी महाराष्ट्रात सभा, दौरे करुन महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न केला. लोकसभेप्रमाणचे विधानसभेत सुध्दा अशीच परिस्थिती राहणार आहे. लोकसभेत ज्या प्रमाणे महाराष्ट्रात चमत्कार घडला. तसाच चमत्कार विधानसभेत सुध्दा घडेल, असा विश्वास देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपाच्या केंद्रीय समितीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत, यासंदर्भात छेडले असता भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे केंद्रीय समितीला फडणवीस यांचा राजीनामा मंजूर करू नये, अशी विनंती करणार असल्याची बातमी वाचली. खरे पाहता फडणवीस यांच्याच घाणेरड्या राजकारणामुळे राज्यात भाजपाची पिछेहाट झाली. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी किंवा बेरोजगारांसाठी काहीही केले नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी शेतकरी व बेरोजगारांमध्ये नाराजी आहे. यामुळे फडणवीस हे जर पुन्हा याच पदावर कायम राहिले, तर याचा फायदा महाविकास आघाडीलाच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा