पुढारी ऑनलाईन डेस्क : आयोध्येतील राम मंदिर जागा खरेदीमध्ये मोठा घोटाळा (Ram Mandir Land Scam) झाल्याचे समोर आले असून एका इंग्रजी वृत्तपत्राने शोधपत्रकारिता करून त्याबाबत वृत्त दिल्यानंतर याबाबत चर्चा सुरू झाली आहे. २०१७ मध्ये एका व्यक्तीला विकलेल्या जमिनीचा तुकडा संबधित व्यक्तीने दोन भाग करून विकला. या व्यवहारात प्रॉपर्टी डिलरने एक भाग ८ कोटी रुपयांना तर दुसरा भाग तब्बल १८. ५ कोटी रुपयांना श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला विकला आहे.
या घोटाळ्याची चौकशी सुप्रीम कोर्टाने करावी अशी मागणी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी आणि बसपच्या नेत्या मायावती यांनी केला आहे.
आयोध्येतील २२ हजार चौरस मीटरची जमीन हरिश पाठक आणि कुसूम पाठक यांच्या नावे नोंद होती. त्यांनी ती जागा एका व्यक्तीला २ कोटी रुपयांना विकली. २०१७ मध्ये एका व्यक्तीने जमिनीचा १० हजार चौरस मीटरचा भाग राम मंदिर ट्रस्टला ८ कोटी रुपयांना विकला. उर्वरित १२०० चौरस मीटरचा भाग रविमोहन तिवारीला दोन कोटींना विकला. राम मंदिर ट्रस्टला विकताना ही १० हजार चौरस मीटरची जमीन ८ कोटी आणि खासगी व्यक्तीला त्यापेक्षाही जास्त क्षेत्रफळाची जमीन २ कोटी रुपयांना विकली गेली. त्यानंतर रविमोहन तिवारी याने २ कोटी रुपयांची ही जमीन ट्रस्टला १८.५ कोटी रुपयांना विकली.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने अयोध्येत एकाच दिवशी म्हणजेच १८ मार्च, २०२१ रोजी अनुक्रमे १८.५ कोटी आणि ८ कोटी रुपयांच्या दोन वेगवेगळ्या किमतीत १२०८ हेक्टर आणि १०३७ हेक्टर जमीन खरेदी केली आहे. या दोन्ही जागांचे मालक वेगवेगळे आहेत. २०१७ मध्ये ही जमीन हरिश पाठक आणि कुसूम पाठक यांच्या नावावर नोंदणीकृत होती.
१८ मार्च रोजी श्रीर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने १२०८ चौरस मीटरची जागा सुलतान अन्सारी आणि प्रॉपर्टी डीलर रविमोहन तिवारी यांच्याकडून १८.५ कोटी रुपयांना खरेदी केली. हीच जमीन या दोघांनी पाठक यांच्याकडून २ कोटी रुपयांना खरेदी केली होती. १८ मार्च रोजीच ट्रस्टने आणखी एक जमिनीचा तुकडा जो वरील जागेपेक्षा कमी क्षेत्रफळाचा म्हणजेच १०३७ चौरस मीटरचा आहे तो ८ कोटी रुपयांना खरेदी केला.
उत्तरप्रदेश सरकारच्या एकात्मिक तक्रार निवारण प्रणाली वेबसाइटवर उपलब्ध कागदपत्रांवरून संबधित इंग्रजी वृत्तपत्राने माहिती काढली असता त्यात दोन्ही जागा एकत्रितपणे गट नंबर २४२, २४३, २४४ आणि २४६ नोंद आहेत. या जमिनीबाबत हरीश पाठक, कुसुम पाठक आणि सुलतान अन्सारीसह अन्य नऊ व्यक्तींमध्ये सप्टेंबर २०१९ मध्ये करार झाला आहे. त्या करारानुसार त्यांना २ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
१८.५ कोटी रुपयांना विकेला १२०८ हा जमिनीचा तुकडा गट नंबर २४३, २४४ आणि २४६ मधील आहे. तर ८ कोटी रुपयांना विकलेला १०३७ कोटी रुपयांचा जमिनीचा तुकडा गट नंबर २४२ मधील आहे.
या जमीन व्यवहाराबाबत शिवसेनेचे नेते संतोष दुबे आणि वाराणसीचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी फैजाबाद कोर्टात याबाबत याचिका दाखल केली. त्यानुसार कोर्टाने श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सचिव चंपत राय आणि अन्य तिघांना या व्यवहाराबाबत नोटीस बजावली आहे.
याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, मंदिराची मालकी देवतांची आहे. त्यामुळे ती विकण्याचा कोणालाही अधिकार नाही. कोणीही ती मालमत्ता विकू अथवा दान करू शकत नाही. राम मंदिराला खूप धार्मिक महत्त्व आहे आणि ते रामायण काळाशी जोडले असल्याने मंदिर पाडू नये.'
वास्तविक विरोधक आरोप करतात त्याप्रमाणे या जागेचा व्यवहार मूळ मालक आणि अन्य नऊ जणांत झालेला दाखवला असला तरी लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी ही जागा खरेदी केली आणि चढ्या भावाने विकून ट्रस्टची फसवणूक केली आहे. लोकांनी श्रद्धेने दिलेल्या पैशांचा हा दुरुपयोग आहे. ९ नोव्हेंबर, २०१९ रोजी जागा खरेदीमधील घोटाळ्यांबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याच दिवशी सुप्रीम कोर्टाने मंदिर उभारणीला परवानगी दिली होती.
Ram Mandir Land Scam : विरोधी पक्ष आक्रमक
भाजपचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या राम मंदिर बांधकामात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप आता विरोधी पक्ष करत आहेत. हा घोटाळा बाहेर आल्यानंतर सरकारने चौकशीचे आदेश दिल्याचे बोलले जात होते मात्र, तसे काहीच झालेले नाही असे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी म्हणाल्या. या लुटीची सुप्रीम कोर्टाने चौकशी केली पाहिजे.
चौकशी कोण करत आहे?
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, उत्तर प्रदेश सरकार म्हणतेय की, आम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत त्याची चौकशी कोण करत आहे? तपास कोण करत आहे याचा थांगपत्ता लागत नाही. या व्यवहारात एक जिल्हास्तरी अधिकारी आणि भाजपचा एक महापौर साक्षीदार आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश सरकार चौकशी करेल असे नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशने राम मंदिर ट्रस्टची स्थापना केली. त्यामुळे सुप्रीम कोर्टानेच ही चौकशी करायला हवी. ट्रस्टने वाढीव आणि फुगलेल्या दराने जमीन खरेदी केली असून भाजप, आरएसएसचे नेते आणि सरकारी अधिकारी यांनी जमा केलेल्या पैशाचा दुरुपयोग केला आहे. राम मंदिराजवळ लूट सुरू असून या लुटीत भाजपचे नेते, पदाधिकारी आणि योगी आदित्यनाथ सरकारचे अधिकारी सहभागी आहेत.
हेही वाचा :