वणव्यांमुळे वनसंपदा लयाला : समाजकंटकांकडे वन विभागाचे दुर्लक्ष
![](https://d2n2y7fp2ncdvv.cloudfront.net/files/2024/03/13114559/mh.jpg)
पौड रोड : पुढारी वृत्तसेवा : पौड रोडवरील म्हातोबा टेकडीवर मागील एक महिन्यापासून वणव्याच्या घटना घडत आहेत. समाजकंटकांकडून टेकडी परिसरात आग लावली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. वन विभागाने परिसरात गस्त घालून वणवे लावणार्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. म्हातोबा देवस्थान तसेच वॉकिंग ग्रुप व इतर सहयोगी संस्थांकडून टेकडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहेत. परिसरात हजारोंच्या संख्येने झाडे लावण्यात आली असून, त्यांचे संगोपन केले जात आहे.
मात्र, मागील महिन्यापासून टेकडीवर अज्ञात नागरिकांकडून आग लावली जात असल्याने वनसंपदेचे नुकसान होत आहे.
वन विभागाच्या दुर्लक्षामुळे टेकडी परिसरात असलेली झाडांची रोपे लागवडीविना जळून चालली आहेत. तसेच आगीच्या घटना देखील वारंवार घडत आहेत. वन विभागाने परिसरात असलेल्या रोपांचे संवर्धन करावे आणि वणवे लावणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
टेकडी परिसरात लागवडीसाठी रोपे आणून ठेवली आहेत. मात्र, सध्या पाण्याअभावी ती जळून चालली आहेत. या ठिकाणी लावण्यात येणार्या वणव्यांकडे देखील वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
अॅड. अमोल काळे, आम आदमी पक्ष
वन विभागाच्या हद्दीतील गैरप्रकार रोखण्यासाठी गणपती माथा, वनदेवी परिसरात सीसीटीव्ही कॉमेरे बसविले आहेत. म्हातोबानगर टेकडीवर देखील काही दिवसांत कॉमेरे बसविण्याचे नियोजन आहे.
प्रदीप सपकाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी
हेही वाचा