आढळरावांनी आता हाती घड्याळ बांधावे : कार्यकर्त्यांचा सूर | पुढारी

आढळरावांनी आता हाती घड्याळ बांधावे : कार्यकर्त्यांचा सूर

सुरेश वाणी

नारायणगाव : शिरूरचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रचाराची एक फेरी उरकली, तरी अजूनही माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीबाबत महायुतीत कोणताही निर्णय होत नसल्यामुळे आढळराव निवडणूक लढविणार किंवा नाही, याबाबत उलटउलट चर्चा होऊ लागली आहे. परिणामी, आढळराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील चलबिचल सुरू झाली आहे. आढळराव पाटील यांनी धनुष्यबाणाऐवजी घड्याळावर निवडणूक लढवावी, असा सूर कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी गेल्या पाच-सात महिन्यांपासून मतदारसंघामध्ये पूर्णपणे तळ ठोकला आहे. ते शरद पवार यांच्यासोबत राहिल्याने त्यांच्याबद्दलची सहानुभूती वाढत आहे. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील दररोज मतदारसंघामध्ये फिरत राहिले.

परंतु, गेल्या महिनाभरापासून त्यांच्या उमेदवारीबाबत कोणताही निर्णय होत नसल्याने ते काही प्रमाणात बॅकफुटवर गेल्याचे दिसत आहे. त्यांना शिवसेनेकडून की राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार? याबाबत देखील संभ्रमावस्था आहे. दरम्यान, शिरूर मतदारसंघामध्ये शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गटाची ताकद फारशी नाही. अनेक गावांमध्ये त्यांना तर बूथवर देखील कार्यकर्ता मिळणार नाही, अशी काहीशी परिस्थिती आहे. तथापि, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून लोकसभेची उमेदवारी लढवावी; जेणेकरून कार्यकर्त्यांचा संच उपलब्ध आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या तीनही पक्षांचा आढळराव पाटील यांना चांगला फायदा होऊ शकतो. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविल्यास किमान बूथवर थांबायला कार्यकर्ते तरी उपलब्ध असतील, असा सूर आता त्यांच्याच कार्यकर्त्यांमधून निघत आहे.

हेही वाचा

Back to top button