Pune News : महाविकास आघाडीच्या आक्रोश मोर्चाला जुन्नर येथून प्रारंभ
नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : कांदा निर्यात संदर्भात केंद्राचे धोरण, दुधाचे वाढलेले बाजार भाव द्यावे यासंदर्भात आक्रोश करत शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीच्या आक्रोश मोर्चाला बुधवारी (दि. २७)सुरुवात केली. प्रारंभी शिवनेरीच्या पायथ्याशी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना खा. डॉ. कोल्हे नतमस्तक झाले. त्यांच्यासोबत विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुषार थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष आनंदराव चौगुले, बाबा परदेशी, मंगेश अण्णा काकडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक घोलप, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर, सुनील मेहर, शरद चौधरी, विजय कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार अमोल कोल्हे यांनी भारतीय जनता पक्षावर यावेळी सडकून टीका केली. ते म्हणाले, भाजप सरकारने शेतकऱ्यांचे वाटोळं केलं आहे. कांद्याची निर्यात बंद केली. दुधाचे बाजार भाव पडले. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे. प्रचंड महागाई वाढवून भाजप सरकार शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये माती कालवत आहे. भाविक लोकांचं हे धार्जिणे हे सरकार आहे. सामान्य शेतकऱ्यांचा आधार शरद पवार आहेत, म्हणूनच शेतकरी बांधवांनी या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनीही विचार मांडले.
हेही वाचा