लग्न झाल्यानंतर मध्यरात्री नवरी पसार | पुढारी

लग्न झाल्यानंतर मध्यरात्री नवरी पसार

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील तांदळी गावामध्ये लग्नानंतर मध्यरात्रीच नवरी पळाल्याची घटना घडली आहे. लग्न जमविण्यासाठी नवरीकडील ‘एजंटा’ने घेतलेले दोन लाख रुपये, नवरीच्या अंगावरील दागिने घेऊन नवरी पसार झाल्याने परिसरामध्ये फसवणूक झाली असल्याची चर्चा सुरू आहे. तांदळी गावामध्ये हा लग्न समारंभ पार पडला होता. लग्नासाठी मध्यस्थी करणार्‍या एजंटला दोन लाख रुपये नवरदेवाकडील नातेवाइकांनी रोख दिले असल्याची चर्चा सुरू आहे. नवरीलाही लग्नामध्ये दागिने घातले होते. साखरपुडा, हळद, जेवण असा या लग्न समारंभाचा कार्यक्रम सर्व काही व्यवस्थित पार पडल्यानंतर नवरीकडील नातेवाईक निघून गेले. नवरीबरोबर एकच कलवरी सोबत राहिली; परंतु मध्यरात्रीच्या सुमारास या दोघींनी पळ काढला . एका ग्रामस्थाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.

मात्र,  त्यालादेखील धक्का देऊन या दोघी चारचाकी गाडीमध्ये बसून पसार झाल्या असल्याचे समजते. नवरीबाई व तिच्याबरोबर असणारी कलवरी पळून गेल्याचे नवरदेवाच्या नातेवाइकांच्या लक्षात आले की, आपली फसवणूक झाली आहे. त्यानंतर मुलाकडील नातेवाइकांनी मध्यस्थी करणार्‍याशी मोबाईलवरून संपर्क साधला; परंतु तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. संबंधित नातेवाइकांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केले.

सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव म्हणाले की, लग्न जमवणा-या एजंटचे सध्या सगळीकडेच प्रमाण वाढले आहे. मुलांची लग्ने जमत नसल्याने काही नागरिक पैसे देऊन एजंटला लग्न जमवण्यास सांगतात त्यामुळे फसवणुकीचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पूर्ण खात्री पटल्याशिवाय लग्न जमवणार्‍या एजंटला पैसे देऊ नये. सध्या अनेक ठिकाणी मुलांचे लग्न जमत नसल्याने मुलांचे नातेवाईक मुलीच्या बाजूकडील मध्यस्थी करणार्‍या ’एजंट’ला पैसे देऊन लग्न जमवतात, त्यामुळे काही ठिकाणी याचाच फायदा लग्न जमवणारे एजंट वर्ग घेतात आणि पसार होतात. लग्न झाल्यानंतर मुलगी ही लगेच पळून जाते. असे प्रकार या भागामध्ये दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

हेही वाचा :

Back to top button