

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील अकृषी विद्यापीठे, तंत्र विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी नव्या स्वरुपात विद्यार्थी जीवन व अपघात विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना पाच लाखांचा अपघात विमा वर्षभरासाठी केवळ 62 रुपयांत मिळणार आहे. तर एक लाखाच्या विम्यासाठी केवळ 20 रुपये मोजावे लागतील. विद्यार्थी वैद्यकीय विमा योजनेत 422 रुपयांत दोन लाखांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
उच्च शिक्षण विभागाकडून सोमवारी याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. विमा योजनांसाठी उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी आयआरडीए परवानाधारक विमा कंपनी निवडण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली. त्यानुसार विद्यार्थी अपघात विमा योजनेसाठी एका खासगी विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. ही कंपनी 20 रुपयांमध्ये एक लाखाचे विमा संरक्षण देणार आहे.
विद्यार्थी वैयक्तिक अपघात विमा योजनेतील पाच लाखांच्या विमा संरक्षणासाठी 62 रुपये भरावे लागणार आहेत. एक वर्षांसाठी हे विमा संरक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या योजनेत विद्यार्थ्यासोबतच त्याच्या पालकांपैकी एका व्यक्तीलाही हे संरक्षण मिळणार आहे. तर विद्यार्थी वैद्यकीय विमा योजनेत दोन लाखांचे संरक्षण असेल. त्यासाठी 422 रुपये भरावे लागणार आहेत. तिन्ही योजना ऐच्छिक स्वरुपाच्या असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा