Pimpri news : कामाचा अतिताण ठरू शकतो मारक; ताणतणावाशी संबंधित 30 टक्के रुग्ण : तज्ज्ञांचे निरीक्षण

Pimpri news : कामाचा अतिताण ठरू शकतो मारक; ताणतणावाशी संबंधित 30 टक्के रुग्ण : तज्ज्ञांचे निरीक्षण

पिंपरी : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत विविध क्षेत्रात वाढलेले टार्गेट्स, मर्यादेपेक्षा कामाची जादा जबाबदारी, वेळेत काम पूर्ण करण्यासाठी सुरू असलेली धावपळ अशा विविध कारणांमुळे कामाच्या ठिकाणी ताण वाढू लागला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मानसोपचार तज्ज्ञांकडे तपासणीसाठी येणार्‍या रुग्णांमध्ये साधारण 20 ते 30 टक्के रुग्ण हे ताणतणावशी संबंधित असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

वर्क लाइफ बॅलन्स जमेना

आयटी क्षेत्रात तसेच, विविध कार्पोरेट कंपन्यांमध्ये कामाच्या डेडलाईन ठरलेल्या असतात. दिलेल्या वेळेत ठराविक काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिलेले असते. बर्याचदा मर्यादेपेक्षा अधिक कामही एकाच व्यक्तीकडे सोपविले जाते. त्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण निर्माण होतो. कुटुंबासाठी खूप कमी वेळ मिळतो. काही जण कामाला वाहून घेऊन अक्षरशः 12 ते 14 तास काम करतात. पर्यायाने वर्क लाइफ बॅलन्स टिकविण्यात अडचणी येतात.

आरोग्यावर होतो परिणाम

कामाचा अतिताण घेतल्याने त्याचा परिणाम आरोग्यावरदेखील होतो. लवकर थकवा येणे, उच्च रक्तदाब, नैराश्य येणे, चिडचिड, चिंतारोग, झोपेची समस्या तसेच जीवनशैलीशी संबंधित मधुमेह हा आजार उद्भवतो.

व्यसनाधीनतेमध्ये वाढ

नोकरी न मिळणे, कामाचे पैसे वेळेवर न मिळणे, कामाच्या ठिकाणी तणावजन्य परिस्थिती असणे अशा विविध कारणांमुळे शहरातील मानसोपचार तज्ज्ञांकडे तपासणीसाठी येणार्‍या रुग्णांचे सरासरी प्रमाण हे 20 ते 30 टक्के असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. वाढत्या ताणतणावामुळे व्यसनाधीनतेमध्ये वाढ होत असल्याचे निरीक्षणही मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

ताणतणाव कसे कमी कराल?

  • ताणतणावाचे सुयोग्य व्यवस्थापन करा.
  • सकारात्मक विचार आणि सकारात्मक सवयी लावा.
  • नियमित व्यायाम, योगासन, ध्यानधारणा करा.
  • व्यसन व अन्य वाईट सवयी सोडा.
  • कामाची प्राथमिकता ठरवून वेळेचे नियोजन करा.
  • छंद, आवडीनिवडी जपण्यासाठी वेळ काढा.
  • कुटुंबाकडे किंवा मित्र-मैत्रिणींकडे व्यक्त व्हा.
  • व्यायाम, झोप आणि आहार यांचे संतुलन साधा.

कामाच्या अतिताणामुळे बर्‍याचदा आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आजार जडू शकतात. माझ्याकडे तपासणीसाठी येणार्‍या रुग्णांपैकी 20 ते 30 टक्के रुग्णांमध्ये ताणतणावाची समस्या पाहण्यास मिळते. ताणतणावाचे व्यवस्थापन; तसेच सकारात्मक विचारांचा अंगीकार करणे गरजेचे आहे.

-डॉ. धनंजय अष्टुरकर, मानसोपचार तज्ज्ञ.

वायसीएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागात तपासणीसाठी येणार्र्‍या रुग्णांमध्ये शेतकरी, कामगार यांचे प्रमाण जास्त असते. हाताला काम नसणे, कामाचे पैसे वेळेत न मिळणे अशा समस्या त्यांना जाणवतात. वाढत्या ताणतणावामुळे विविध व्यसनांच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढत आहे. कामाचे व वेळेचे नियोजन करावे. व्यायाम, झोप आणि आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

– डॉ. मधुर राठी, मानसोपचार तज्ज्ञ, वायसीएम रुग्णालय.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news