पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांत 48 नेत्यांची नियुक्ती केली जाणार असून, ते मोदी सरकारच्या योजना मुस्लिम समाजापर्यंत पोहचविणार आहेत. त्यांच्यावर प्रचाराची जबाबदारी राहणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या बैठकीसाठी बावनकुळे बुधवारी पुण्यात आले होते, त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, मुस्लिम समाजात पंतप्रधान मोदींबद्दल आत्मीयता असून, समाजाने भारत यशस्वी होत असल्याचे पाहिले आहे. महायुतीचे सरकार खेळीमेळी व समन्वय साधून लोकहिताचे निर्णय घेत आहे. सरकारमधील सर्वांसाठी सत्ता ही गौण, तर राष्ट्रहित महत्त्वाचे आहे.
मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे, यावर सर्वपक्षीय बैठकीत एकमताने निर्णय झाला. मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या राजस्थान यात्रेवर असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनी उदयनिधी स्टॅलीनचे वक्तव्य त्यांना मान्य आहे का? हे महाराष्ट्राला सांगावे. मान्य नसेल तर इंडिया आघाडी सोडणार का? तुमचे हिंदुत्व बेगडी, तुष्टीकरण करणारे, असेही बावनकुळे म्हणाले.
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणीसंदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उत्कृष्ट वकील आहेत. ते मेरिटचे विद्यार्थी असूनॉ, ते मेरिटवरच निकाल देतील. ते कोणतीही गटबाजी किंवा कुणावरही अन्याय होणार नाही असा निकाल देतील.
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात सर्वोत्कृष्ट काम केले आहे. त्यांचा मतदारसंघात संपर्क चांगला असून, सरकारच्या योजना पोहचविण्यासाठी त्या प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यासमोर कुणीही उमेदवार असला तरी त्या दोन लाखांहून अधिक मतांनी त्या निवडून येतील, अशा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा