![ओबीसीसाठी आता मोदी आवास घरकुल योजना](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F11%2FGharkul-Yojana.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे; पुढारी वृत्तसेवा : घरकुलासाठी राज्य शासनाने मोदी आवास घरकुल योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये ग्रामीण भागात वास्तव्यास असणार्या इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) पात्र कुटुंबांना घरकुल या योजनेतून मिळणार आहेत. योजनेच्या अंमलबजावणीला जिल्ह्यात सुरुवात करण्यात येत आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक शालिनी कडू यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्ह्यात अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदीम आवास योजना तसेच विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना उपलब्ध आहेत.
मात्र, इतर मागास प्रवर्गासाठी अशा कोणत्याही प्रकारची योजना अस्तित्वात नव्हती. त्यामुळे या प्रवर्गातील कुटुंब पात्र असूनही घरकुल योजनेपासून वंचित राहत होते. त्या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर मागास वर्गासाठी 3 वर्षांत 10 लाख घरे पूर्ण करण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. तसा प्रस्ताव मंत्रिमंडळात मान्य करण्यात आला. त्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाने नुकतेच त्याचे शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
पंतप्रधान आवास योजनेत अपात्र ठरलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे. त्यांना आता मोदी आवास योजनेतून घरकुल योजनेतून घराचे स्वप्न पूर्ण होईल. इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजारांपेक्षा जास्त नसावे. कुटुंबीयांचे मालकीचे राज्यात पक्के घर नसावे. गृहकर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट नसावा, अशी अट असणार आहे.
– शालिनी कडू,
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
हेही वाचा