गुड न्यूज ! कळमोडी धरण १०० टक्के भरले | पुढारी

गुड न्यूज ! कळमोडी धरण १०० टक्के भरले

वाडा : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्याला तसेच आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारास वरदान ठरणारा कळमोडी प्रकल्प १०० टक्के भरला असून सांडव्यावरून पुर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग आरळा नदी पात्रात होत असल्याचे धरण प्रशासनाने दिली आहे. विशेष बाब म्हणजे पुणे जिल्ह्यातील १०० टक्के भरलेले हे पहिलेच धरण ठरले आहे. धरण भरून वाहू लागल्याने पश्चिम पट्ट्यातील ग्रामस्थांमध्ये शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

खेड तालुक्यातील पश्चीम भागातील गावांसह आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारास वरदान ठरणारे कळमोडी धरण सोमवारी (दि. १७) रात्री उशिरा पुर्ण क्षमतेने भरताच धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली आहे. या धरणात सन २०१० पासून पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यास सुरूवात झाली असून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणास कोणत्याही प्रकारचे दरवाजे नाही. धरण भरताच सांडव्यावरून वेगाने पाणी वाहण्यास सूरूवात होते.

कळमोडी धरण परिसरात पावसाचा जोर गेली दोन दिवसांपासून वाढला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गाव व परिसरात पावसाचा जोर चांगला राहिल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होवून धरण १०० टक्के भरले. धरणात ४२.८७ द.ल.घ.मी. म्हणजेच १.५१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कळमोडी धरण भरल्याने चास कमान धरणाच्या जलसाठा वाढण्यास मदत होणार आहे. गतवर्षी धरण ११ जुलैला भरले असुन चालु वर्षी १७ जुलै हा दिवस उजाडला आहे.

कळमोडी धरण व परिसरात एक जुनपासून ४२८ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. कळमोडी धरण भरल्याने या धरणातून बाहेर पडणारे पाणी चासकमान धरणात येत असल्याने चासकमान धरणातील पाणीसाठा वेगाने वाढण्यास मदत होणार आहे. आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार या भागासाठी आरक्षित असो १.१४ हे पाणी चासकमान प्रकल्पाचा घळ भरणीसाठी वापरण्यात येते, परंतु प्रकल्पासाठी कालवा नसल्याने आरळा नदीच्या पात्रातून पाण्याचे वितरण केले जाते. त्यामुळे कळमोडी चिखलगाव व साकुर्डी, देवोशी व अंतर्गत कुडे, बांगरवाडी, येनिये या गावातला सुद्धा पाण्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.

पश्चिम भागातील अनेक गावाच्या पाणीपुरवठा योजना या कळमोडी प्रकल्पावर अवलंबून असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा या निमित्ताने सुटला आहे. प्रत्यक्षात धरणाची साठवण क्षमता जरी १.५१ टीएमसी असली तरी अंतर्गत असलेला राडारोडा यामुळे पाणीसाठा मात्र कमी प्रमाणात होत असल्याने नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. आतमध्ये असणारा राडारोडा काढण्याची मागणी सातत्याने ग्रामस्थ व शेतकरी करीत आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आठ ते दहा दिवस धरण उशिरा भरले असून अनियमित्त पावसामुळे चिंतेत असलेले शेतकरी वर्ग धरण भरल्याने आनंदी असल्याचे पहावयास मिळाले. धरणांतर्गत असणारा दगडीचा मोठा साठा बाहेर काढण्याची मागणी कळमोडी प्रकल्प संघ समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच बाळासाहेब गोपाळे व ग्रामस्थांच्या वतीने सातत्याने केली जात आहे. यावर्षी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे धरणाची उंची वाढवण्यासाठी शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहेत.

हे ही वाचा :

राज्यातील बहुतांश पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे; राजकारणाचे गुन्हेगारीकरण

Ganeshotsav 2023 : यंदा १९ दिवस उशिराने गणपती बाप्पांचे आगमन

Back to top button