पुणे : पुढारी वृत्तसेवा : बालगंधर्व रंगमंदिराच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये दिला जाणारा 'जीवनगौरव' पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती बालगंधर्व परिवाराचे मेघराजराजे भोसले, अॅड. मंदार जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा महोत्सव दि. 26 ते 28 जून दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. दि. 26 जून रोजी सकाळी 10 वाजता नांदी आणि गणेशवंदनेने ह्या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. सायं. 4 वाजता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
या महोत्सवात प्रामुख्याने जादूचे प्रयोग, महाराष्ट्राची लोकधारा, चांडाळ चौकडीच्या करामती, प्रसिद्ध अभिनेते समीर चौगुले यांची मुलाखत, हिट्स ऑफ लता मंगेशकर व आर. डी. बर्मन संगीत रजनी, पारंपरिक भारुड, महिलांसाठी मंगळागौर, लावणी महोत्सव, 'दादांची आठवण आली का', नाट्य-चित्रपट अभिनेते प्रशांत दामले यांच्याशी सौमित्र पोटे यांनी साधलेला संवाद यांसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
महोत्सवाची सांगता दि. 28 जून रोजी सायं. 4 वा. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी विविध पुरस्कारांचे वितरण होणार असून, त्यामध्ये संगीत नाटकांसाठी वर्षा जोगळेकर, कला उद्योजक डॉ. संतोष चव्हाण, बुकिंग क्लार्क अमित मांडवकर यांसह नाटक विभाग, बालगंधर्व कार्यालय, ध्वनीव्यवस्था, प्रकाशयोजना, लोकधारा विभाग, लावणी विभाग, नृत्य दिग्दर्शक, ज्येष्ठ तमाशा कलावंत, ऑर्केस्ट्रा विभाग अशा विविध विभागांतील कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त तब्बल 55 किलोचा केक कापून सांगता होणार आहे.
हे ही वाचा :