धोकादायक वीज तारांकडे दुर्लक्ष; उंड्री परिसरातील चित्र

कोंढवा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : रस्त्यावर एखादी व्यक्ती सरळ हात वर करून उभी राहिली तर, विजेच्या तारा अवघ्या दोन फुटांवर राहताहेत. अशा धोकादायक वीज तारांमुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते. महावितरणने तातडीने याठिकाणी उपाययोजना केली तरच अनर्थ टळू शकतो.
उंड्री स.न. 50 येथील एका रस्त्यावर वीज खांबावरच्या तारा उडी मारली तर निश्चितपणे हातात येतील अशा धोकादायक उंचीवर आहेत. महावितरणचे कर्मचारी, अधिकारी या परिसरात पाहाणी करत असतील तर, त्यांच्या हे लक्षात येईल. या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. या परिसरात माल वाहतूक करणार्या वाहनांची वर्दळ सुरू असते. अशावेळी एखादी दुर्घटना घडली तर मोठा अनर्थ घडू शकतो.
वीज तारा जवळ येण्याचे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर भराव टाकण्यात आला आहे. वरील वीज तारांचा विचारच केलेला नाही असे पाहणी करताना सहज लक्षात येते. सध्याची परिस्थिती लक्ष्यात घेतली तर, वीज तारा खूपच धोकादायक आहेत. त्यावर तातडीने उपाययोजना व्हायला हवी व त्या भूमिगत कराव्यात, अशी मागणी प्रवीण आबनावे यांनी केली आहे.
हेही वाचा
नगर : राहुरी नगरपरिषदेला दीड कोटीचे बक्षीस ; माझी वसुंधरा अभियानात नाशिक विभागात प्रथम