अनिल तावरे
सांगवी (पुणे) : निरा नदीवरील दोन्ही बाजूंच्या काठांवर विविध प्रकारचे सहकारी व खासगी प्रकल्प आहेत. बहुतांश ठिकाणी एकाच राजकीय संघटनेच्या अधिपत्याखाली चालणारे हे प्रकल्प आहेत. या प्रकल्पातील रसायनमिश्रीत सांडपाणी ओढ्यावाटे थेट निरा नदीच्या चांगल्या पाण्यात सोडून दिले जाते. या रसायनमिश्रीत सांडपाण्यामुळे नदीतील पाणी दूषित होऊन उग्र वासाने नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला होता.
त्याचवेळी राज्य व केंद्र सरकारने लक्ष घालून निरा नदीच्या काठावर लक्ष देण्यास सुरुवात केली. दूषित पाण्याचे पाप झाकण्यासाठी राजकीय व जलसंपदा विभागाच्या वतीने कालव्याचे हक्काचे पाणी वळवून नदीत सोडण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. एकीकडे उसाला पाणी कमी पडत असताना निरेत कालव्याचे पाणी सोडले जात आहे.
निरा नदीवरील बंधारे अडविण्यात आले की, फेब्रंवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच बंधार्यांच्या चांगल्या पाण्यात दोन्ही तालुक्यातील विविध प्रकल्पांचे रसायनमिश्रीत सांडपाणी मिसळून प्रदूषित होत असते. त्यामुळे नदीकाठच्या गावांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपच्या वतीने गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघात लक्ष घालून राज्यासह केंद्रातील नेत्यांनी या मतदारसंघातील जनतेच्या महत्त्वांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बारकाईने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
त्याच अनुषंगाने नोव्हेंबर 2022 च्या दुसर्या आठवड्यात केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल हे बारामती तालुक्यातील राजकीय पार्श्वभूमी असलेल्या सांगवी गावात मुक्कामी आले असता सरपंच चंद्रकांत तावरे यांनी निरा नदीच्या प्रदूषणाची वारंवार होणारी अडचण दूर करण्यासाठी पटेल यांना ग्रामपंचायतीच्या वतीने लेखी निवेदन दिले होते. त्यानंतर पटेल यांनी मी लक्ष घालून या गंभीर प्रश्नावर उपाययोजना करण्याचे आश्वासन पटेल यांनी दिले होते.
फेब्रुवारी 2023 पासून निरा नदीच्या प्रदूषणाची वाढ होऊन नदीतील पाणी काळेकुट्ट होऊन नदीकाठच्या गावांमध्ये उग्र वासाने नागरिक हैराण झाले होते. 26 मार्च 2023 रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगवी येथे नदीच्या प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्याच दरम्यानच्या अगोदरच धरणातून आणि निरा डाव्या कालव्याच्या विविध ओढ्यांवाटे प्रदूषित बंधार्यांच्या पाणलोट क्षेत्रात पाणी सोडून पाप झाकण्यासाठी असा प्रकार केल्याचा आरोप संतप्त शेतकर्यांनी बावनकुळे यांच्या समोर व्यक्त केला होता.
तसेच बावनकुळे नदीच्या प्रदूषणाची पाहणी करत असतानाच त्यांनीही मी स्व:त हैराण झालो असून, नदीकाठचे लोक कसे जीवन जगत असतील अशी चिंता व्यक्त केली होती. या पाहणीनंतर बावनकुळे यांनी मी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने राज्य आणि केंद्र सरकारला लक्ष घालण्याचे आश्वासन शेतकर्यांना दिले होते. आता त्यावर काही अंशी काम होत असताना दिसत आहे.
हेही वाचा