दुचाकीची धडक, तिघांचा मृत्यू; अहमदनगर महामार्गावरील अपघात
कोरेगाव भीमा : पुढारी वृत्तसेवा: कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील पुणे- नगर महामार्गालगत कल्याणी चौकात दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात तिघा युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून गुरुदास दत्तात्रय सूर्यवंशी, सागर गुरू नानावत व सुदानंद अनिल नानावत असे मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत.
24 जून रोजी रात्री महामार्गावरील अहमदनगर बाजूने कोरेगाव भीमा येथील सलून व्यावसायिक गुरुदास दत्तात्रय सूर्यवंशी (वय 50 रा. दामोदरनगर कोरेगाव भीमा, ता. शिरुर)हे दुचाकीवरून( एम एच 12 एल जी 5548) येत असताना समोरून पुणेकडून विना नंबरच्या दुचाकीहून सागर गुरु नानावत (वय 17रा. शेरेवस्ती धानोरे ता. शिरुर ) व सुदानंद अनिल नानावत (वय 18 रा.सणसवाडी ता. शिरूर) आले, यावेळी दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला,
यावेळी अपघातात तिघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिघांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंके करत आहेत.
चौकात पांढरे पट्टे, ब्लिंकरची गरज
कोरेगाव भीमासह पुणे-नगर महामार्ग रस्त्याचे सहापदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आल्याने वाहने वेगात जात आहेत. मात्र, रस्ता ओलांडताना पादचार्यांच्याही अपघातात जीवावर बेतत असल्याने कल्याणी चौक, वाडा पुनर्वसन चौक व कोरेगाव भीमा येथील चौकांमध्ये पांढरे पट्टे व ब्लिंकर बसविण्याची मागणी सरपंच अमोल गव्हाणे, प्रकाश ढेरंगे व ग्रामस्थ यांच्या वतीने होत आहे.
हेही वाचा
सातारा : मध्यरात्री महिला, मुले पाहून कार हायजॅक