पिंपरी : पवना धरणात 21.46 टक्के पाणीसाठा
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुक्यातील पवना धरणात रविवार (दि. 11) पर्यंत एकूण 21.46 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तो पाणीसाठा जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल इतका आहे. जून महिन्याचे 11 दिवस झाले तरी, अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही; मात्र पाऊस अजूनही लांंबल्यास पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्यातील अनेक गावांवर पाणी कपातीची संकट येऊ शकते.
पवना धरणातून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दररोज 500 एमएलडी पाणी उचलले जाते. ते पाणी शुद्ध करून पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच, एमआयडीसीकडून 30 एमएलडी शुद्ध पाणी घेतले जात आहे. कडक उन्हामुळे पवना धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्फीभवन होत आहे. त्यामुळे पाण्याचा साठा वेगात कमी होत आहे. धरणातील साठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने जमीन उघडी पडल्याचे दिसून येत आहे. तीव्र उष्णतेमुळे तसेच, पिण्यासाठी नियमितपणे पाणी सोडल्यामुळे पवना धरणात रविवारपर्यंत केवळ 21.46 टक्के इतका पाणी साठा शिल्लक आहे. हा साठा जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत पुरेल इतका आहे. दरम्यान, गेल्या वर्षी याच दिवशी पवना धरणात 22.86 टक्के इतका पाणी साठा होता.
पवना धरणातील पाणीसाठा
सध्या 21.46 टक्के
गेल्या वर्षी 22.86 टक्के
पाणी काटकरीने वापरण्याची गरज
वाढत्या उष्म्यामुळे पवना धरणातील पाणीसाठ्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे पाणी पातळी घटत चालली आहे. जूनचा पहिला आठवडा सरूनही पाऊसही सुरू झालेला नसल्याने पाणीसाठ्यात वाढ होत नाही. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे, असे पवना धरणाचे अभियंता समीर मोरे यांनी सांगितले.