पुणे : खूनाची चौकशी केलेल्या एकाची आत्महत्या
उरुळी कांचन, (जि. पुणे ), पुढारी वृत्तसेवा : पिंपरी सांडस (ता. हवेली) येथे भीमा नदीत शिर धडावेगळे करुन, हात-पाय छाटलेला अवस्थेत सापडलेल्या संतोष तुकाराम गायकवाड (रा. भवरापूर) यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या खूनाचा तपास करणाऱ्या लोणी काळभोर, लोणीकंद तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा युनिट ६ च्या संयुक्त पोलिस पथकाने या खूनातील तपासासाठी चौकशी केलेल्या एकाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची खळबळजनक प्रकार घडला.
या व्यक्तिने चिठ्ठीत असे लिहीले आहे की, तपासाच्या भितीने घाबरुन आत्महत्या करत आहे. बाबासाहेब बबन काटे (वय ३२, रा. भवरापूर, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
लोणी काळभोर, लोणीकंद पोलिस व गुन्हे शाखा युनिट क्र. ६ चे पथक या पथकाकडून संतोष गायकवाड यांच्या खूनप्रकरणी पोलिसांकडून मागील तीन दिवस त्यांच्याकडे चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर बाबासाहेब काटे याने लिहलेल्या चिठ्ठीत ”या खूनात आपण सहभागी नसून आपले नोकरीवर खाडे झाल्याने माझ्याकडे पैसे नाहीत. मेल्यानंतर माझ्या मुलीचे व बायकोचे कसे होणार, मला दुसरा दबाव नाही. घरच्यांना कोणीही त्रास देऊ नका तसेच मला जेवढी माहिती होती. तेवढी मी पोलिसांना दिली आहे. मला मरायचं नव्हतं पण माझे नाव आले, त्यामुळे मागील तीन दिवसांपासून मी जेवलो नाही किंवा झोपही लागली नाही. मला माझ्या मुलीला शिकवायचे होते. परंतु मला खूप टेंशन आल्यामुळे मी औषध घेत आहे” असे नमूद केले आहे.
दरम्यान बाबासाहेब काटे यांनी आत्महत्या केल्याने शहर पोलिसांनी या घटनेची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे. या गंभीर गुन्ह्याचा शोध लागावा म्हणून काटे यांचेसह सुमारे २० जणांकडे केवळ चौकशी करण्यात येत होती. यासंदर्भात त्यांना ताब्यातही घेण्यात आले. केवळ तपासाचा भाग म्हणून त्यांना बोलावण्यात आले होते. त्यांच्यावर चौकशीत कसलाच दबाव नव्हता.
हे ही वाचलं का