![छगन भुजबळ,www.pudhari.news](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F04%2F%E0%A4%9B%E0%A4%97%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B3.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आमचे पोलिस बांधव फोन केल्यावर 'जय हिंद' म्हणतात. शिवसेनेचे लोकही प्रथम 'जय महाराष्ट्र' असे बोलतात. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच फाने केला तर जय महाराष्ट्र बोलतात. त्यामुळे आता शिंदेंनीच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना विचारावे की, फोन केल्यावर आता काय म्हणायचं? अशा शब्दांत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी 'वंदे मातरम्' म्हणण्याबाबतच्या आदेशाचा समाचार घेतला. त्याचबरोबर आपण जे आदेश काढतो, त्याचे भान ठेवायला हवे, असेही भुजबळ म्हणाले.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी कर्मचार्यांना फोन उचलल्यावर वंदे मातरम् म्हणण्याचे फर्मान काढले आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, 'मी वंदे मातरम् म्हणणार नाही, मी जय महाराष्ट्र म्हणेन. कायद्याने असे कुणावरही बंधन घालणे योग्य नाही. लोकांच्या आवडी-निवडीनुसार ते बोलतात, असेही भुजबळ म्हणाले. खातेवाटपावरून भुजबळ म्हणाले की, खातेवाटप झाले ही चांगली बाब आहे. कारण कोणते प्रश्न कोणाकडे मांडावेत हेच समजत नव्हते. विधानसभेत आम्ही प्रश्न मांडू, अर्ध्यापेक्षा कमी मंत्री आहेत, परत बदल होतील. 24 खात्यांचे अजून वाटप करणे बाकी आहे. वास्तविक मुख्यमंत्री सगळ्या खात्यांचा प्रमुख असतो. आम्ही सत्तेसाठी आलो नाही, असे ते अगोदर बोलत होते. मग आता ओरडण्याचे कारण काय? असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला.
तसेच गिरीश महाजन यांना जिल्ह्याचे प्रश्न माहीत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना काय सल्ला देणार? देवेंद्र फडणवीस यांच्या ते जवळचे आहेत. त्यामुळे याचा फायदा त्यांनी नाशिकला करून घ्यावा, असा सल्लादेखील भुजबळ यांनी महाजनांना दिला.
पंतप्रधान मोदींच्या विधानाचे स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात सगळ्यांना बरोबर घ्या असे म्हटले. मी त्यांच्या या वक्तव्याचे स्वागत करतो. सगळ्या जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घ्यायला हवे. गांधी घराण्याबद्दल बोलत असतील तर राजीव गांधी यांचे बलिदान विसरता येणार नाही. आज जे नेते दिसत आहेत, त्यांना घराणेशाहीचा इतिहास आहे. यांच्या सरकारमध्येदेखील घराणेशाही आहे, त्याचाही त्यांनी विचार करावा, असेही भुजबळ म्हणाले.