

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इराण आणि इस्त्रायल-अमेरिका यांच्यात उडालेला युद्धाचा भडका दिवसेंदिवस प्रखर होत असल्याने, उद्योग क्षेत्र प्रचंड धास्तावले आहे. गॅसपुरवठा खंडित झाल्याने अन् केंद्र शासनाने व्यावसायिक एलपीजी पुरवठा बंद करण्याचे आदेश दिल्याने, उद्योग क्षेत्रातील खडखडाट हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहे.
विशेषतः ऑटोमोबाइल उद्योगांना याचा सर्वाधिक फटका बसला असून, अंबड औद्योगिक वसाहतीतील १२ पावडर कोटिंग, प्लेटिंगचे उद्योग बंद पडले आहेत. यामुळे दररोज कोट्यवधींचे नुकसान होत असून, रोजगारही धोक्यात आला आहे. ऑटोमोबाइल उद्योगांसाठी नाशिकचे उद्योग क्षेत्र ओळखले जाते.
ऑटोमोबाइलवर आधारित शेकडो लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग सातपूर आणि अंबड या औद्योगिक वसाहतीत कार्यरत आहेत. याशिवाय अंबड औद्योगिक वसाहतीत ११० पेक्षा अधिक पावडर कोटिंग आणि प्लेटिंगचे उद्योग आहेत. या उद्योगांना दरमहा १२०० टन एलपीजी गॅसचा पुरवठा केला जातो. तर साडेतीन लाख किलो 'एमएनजीएल' गॅसचा पुरवठा केला जातो.
सातपूर आणि अंबडमध्ये केवळ २० टक्केच एमएनजीएल गॅसची पाइपलाइन टाकलेली असल्याने, तब्बल ८० टक्के उद्योग एलपीजीवर अवलंबून आहेत. दरम्यान, केंद्र शासनाच्या निर्देशानंतर उद्योगांसाठी एलपीजीचा पुरवठा पूर्णतः बंद करण्यात आल्याने, आतापर्यंत गॅसच्या उपलब्ध साठ्यावर उद्योग सुरू होते.
यातील १२ पावडर प्लेटिंग, कोटिंगचे उद्योग पूर्णतः बंद पडले असून, १५० पेक्षा अधिक रोजगार प्रभावित झाले आहेत. अशीच परिस्थिती आठवडाभर कायम राहिल्यास, उद्योगनगरीतील खडखडाट पूर्णतः शांत होण्याची भीती आता वर्तवली जात आहे.
'एमएनजीएल'कडून ५० टक्के कपात
सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील २० टक्के उद्योगांमध्ये एमएनजीएलच्या माध्यमातून दरमहा साडेतीन लाख किलो गॅसपुरवठा केला जातो. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे एमएनजीएलने काही दिवसांपूर्वीच उद्योजकांना ई-मेल पाठवत पुरवठ्यात ४० टक्के कपात केली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.
तसेच जो पुरवठा केला जाईल, त्यासाठी अतिरिक्त चार्जेस भरावे लागणार असल्याचेही ई-मेलमध्ये नमूद केले होते. दरम्यान, आता एमएनजीएलने उद्योजकांना पुरवठ्यात अनिश्चित काळासाठी ५० टक्के कपात केली जात असल्याचे कळवले आहे. त्यामुळे उद्योजकांची चिंता वाढली आहे.
दोन जहाजांकडे उद्योग क्षेत्राचे लक्ष
आखाती देशांतून एलपीजी घेऊन निघालेली शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची शिवालिक आणि नंदादेवी ही एलपीजीवाहक दोन भारतीय जहाजे गुजरातमधील मुंद्रा आणि कांडला बंदरांकडे शनिवारी (दि. १४) पहाटे होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे पुढे आली आहेत.
९२ हजार ७०० टन एलपीजी असलेली ही जहाजे दोन ते तीन दिवसांत गुजरातच्या बंदरांमध्ये दाखल होणार आहेत. या जहाजातून येणारा एलपीजी उद्योगांसाठी राखीव ठेवला जाईल, अशी अपेक्षा उद्योग क्षेत्रातून केली जात आहे.
आइस्क्रीम उद्योगही प्रभावित
आइस्क्रीम उद्योगालाही एलपीजी पुरवठ्याचा फटका बसत आहे. वास्तविक, आइस्क्रीम आणि एलपीजीचा फारसा संबंध नाही. मात्र, आइस्क्रीमसाठी लागणाऱ्या 'बटर कोन 'ला एलपीजी लागत असल्याने त्याचा परिणाम आइस्क्रीम उद्योगावर होत आहे. कोनच मिळत नसल्याने, ऐन हंगामात हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे.
प्लेटिंग, कोटिंग उद्योगांना दररोज १५० कोटींचा फटका
अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या पावडर कोटिंग, प्लेटिंग उद्योगांना दररोज १५० कोटींचा फटका बसत असल्याचा अंदाज आहे. मेटल फिनिशर्स असोसिएशनकडे एकूण ११० पावडर कोटिंग, प्लेटिंग उद्योगांची नोंद असून, यातील १२ उद्योग पूर्णतः बंद पडले आहेत. उर्वरित उद्योगही बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने, मोठा फटका बसण्याचा अंदाज आहे. या उद्योगावर अवलंबून असलेल्या १५० पेक्षा अधिकार कामगारांचा रोजगार प्रभावित होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत जे उद्योग सुरू आहेत त्यांच्याकडे जेमतेम पुरेल इतकाच एलपीजी शिल्ल्क आहे. त्यामुळे शासानाने लवकर तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एलपीजीचा पुरवठा बंद केल्याने, पावडर कोटिंग, प्लेटिंगच्या उद्योगांना मोठा फटका बसत आहे. आतापर्यंत १० ते १२ उद्योग बंद पडले असून, उर्वरित उद्योगही बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. २५ मार्चपर्यंत अशीच स्थिती राहिल्यास, उद्योग सुरू ठेवणे अवघड होणार आहे.
नितीन गायधनी, सचिव, मेटल फिनिशर्स असोसिएशन