नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी महापालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर मतदारयाद्यांचा कार्यक्रम कधी जाहीर होणार, याची सर्वांनाच प्रतीक्षा लागून आहे. प्रारूप मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छुकांना आपापल्या प्रभागातील मतदारांवर फोकस करता येणार आहे. त्यामुळेच मतदारयाद्यांना विलंब होत असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 25 नोव्हेंबर 2016 रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येऊन लगेचच मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध करून त्यावर राज्य निवडणूक आयोगाने हरकती व सूचना मागविल्या होत्या. तसेच हरकती, सूचनांवर लगेचच सुनावणी घेऊन अंतिम मतदारयाद्या जाहीर केल्या होत्या. यावेळी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आज आठवड्याहून अधिक कालावधी होऊनही अद्याप मतदारयाद्या जाहीर होऊ शकलेल्या नाहीत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकसह राज्यातील 18 महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्य नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. पाऊस कमी पडत असलेल्या ठिकाणी निवडणुका घेण्याबाबत न्यायालयाने निर्देश दिले असले, तरी नाशिक महापालिकेसंदर्भात नाशिक शहरात पडणार्या पावसाचे प्रमाण पाहता, नाशिक महापालिकेच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच होऊ शकतात, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळेच मतदारयाद्यांचा कार्यक्रम घोषित करण्यास राज्य निवडणूक आयोगाकडूनही आस्ते कदम टाकले जात असावे. प्रभागनिहाय मतदारयाद्या जाहीर झाल्यानंतर त्यावर 15 दिवसांचा कालावधी देऊन हरकती व सूचना मागविल्या जातील. त्यानंतर त्यावर सुनावणी घेतली जाईल आणि मगच अंतिम मतदारयाद्या जाहीर केल्या जातील.