देवळाली कॅम्प (जि.नाशिक) : वृत्तसेवा
येथील विजयनगर भागात गुरुवारी (दि. 6) पहाटेच्या सुमारास गोरख शेळके यांच्या मळ्यात मानवी वस्तीजवळ लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
गेल्या काही दिवसांपासून देवळाली कॅम्पच्या विजयनगर भागात बिबट्याचा वावर होता. त्याने अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला होता. यापूर्वीदेखील या भागात बिबट्याचे वास्तव्य होते. मध्यंतरी बिबट्याचा वावर कमी झाल्यानंतर गेल्या 15 दिवसांपासून पुन्हा बिबट्याने या भागात दहशत निर्माण केल्याने वनविभागाने या ठिकाणी शेळके, कदम वस्तीजवळ असलेल्या मळ्यात पिंजरा बसवला होता. गुरुवारी (दि. ६) पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद होताच त्याने फोडलेल्या डरकाळीने परिसरात खळबळ उडाली. शेळके यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार वनपाल विवेक अहिरराव, वनरक्षक राजेंद्र ठाकरे व सहकाऱ्यांनी तातडीने विजयनगर भागात भेट देऊन बिबट्याला ताब्यात घेतले व सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
पावसाळ्यात बिबटे
हा भाग दारणा नदीकाठचा परिसर असल्याने ऑक्टोबर ते मे या दरम्यान या भागात बिबट्याचे वास्तव्य नेहमीच असते. आता पावसाळा सुरू झाला आहे. या दिवसांत बिबटे जंगलात शिकार करीत असतात. मात्र आता हे बिबटे मानवी वस्तीत फिरकत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
हेही वाचा :