![नाशिक : एनडीसीसीच्या सक्तवसुलीला तात्पुरती स्थगिती, शेतकऱ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F06%2FCopy-of-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-3.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा सहकारी बँकेने सुरू केलेल्या कर्जवसुलीच्या धाेरणास सहकारमंत्री अतुल सावे यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. बँकेच्या कर्जवसुलीविराेधात मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत समस्या मांडली होती. त्यानंतर ठाकरे यांनी सावे यांच्यासोबत चर्चा करून वसुलीला स्थगिती आणली आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वसुली धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, शहराध्यक्ष दिलीप दातीर, जिल्हा उपाध्यक्ष अनंत सांगळे यांच्यासह जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांची पुणे येथे भेट घेतली. ठाकरे यांनी सहकारमंत्री सावे यांना दूरध्वनीवरून संपर्क करून कर्जवसुलीबाबत चर्चा केली. त्यानंतर सावे यांनी बुधवारपासून (दि.२१) तीन महिन्यांपर्यंत जिल्हा बँकेची कर्जवसुली कार्यवाही थांबवली जाईल, तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. या निर्णयाने जिल्ह्यातील सुमारे ६५ हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी राज ठाकरे व अतुल सावे यांचे आभार मानले आहेत. शेतकऱ्यांच्या वतीने रावसाहेब आईतवडे, कैलास बोरसे, खेमराज कौर, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा :