![नाशिक : मयत सागर रावतर](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F05%2F%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8-2.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात गुन्हेगारीचे सत्र वाढत असून त्यात आता मागील दोन आठवड्यांपासून लागोपाठ खुनाचे सत्र घडत आहे. शनिवारी दि. 28 मध्यरात्री प्रेमप्रकरणातून भारतनगर येथे एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे.
सागर रावतर असे मयत युवकाचे नाव असून याप्रकरणी सहाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रेमप्रकरणी झालेल्या वादातून मध्यस्थी केल्यामुळे युवकावर हल्ला करत वार करण्यात आले. या हल्ल्यात सागर गंभीर जखमी झाल्याने तत्काळ रुग्णालयात हलविण्यात येत असतांना त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांनी भेट देऊन पाहणी केली. संशयित आरोपी भोये याचे परिसरातच राहणाऱ्या एका मुलीशी प्रेम संबंध होते. परंतु या प्रेमप्रकरणात त्याचे प्रेयसीसोबत वारंवार वाद होत असत. त्यांची मध्यस्थी करण्यासाठी सागर जात असे, याचा राग येऊन त्याच्यावर हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून पुढील तपास सुरू आहे.