नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अर्ध्या अधिक जिल्ह्यात टँकरचा फेरा सुरू आहे. ग्रामीण भागात 1 लाख 22 हजार 701 नागरिकांना तब्बल 57 टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसभरात टँकरच्या 136 फेर्या होत आहेत.
केरळमधून मान्सूनने आगेकूच केली असून, दोन दिवसांत महाराष्ट्रात तो वर्दी देण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्याच्या दृष्टीने ही काहीशी समाधानकारक बाब असली, तरी लांबलेल्या मान्सूनमुळे सध्या टंचाईच्या तीव्र झळा जाणवत आहेत. नाशिक जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील 66 गावे व 51 वाड्या अशा एकूण 117 ठिकाणच्या जनतेला सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईचा सर्वाधिक फटका येवल्याला बसतो आहे. तालुक्यात 44 गावे- वाड्यांना 20 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. मालेगावला 15 ठिकाणी 9 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरविण्यात येत आहे. चांदवडमध्ये 11 गावांसाठी 6 टँकर धावताहेत. याशिवाय पेठ व इगतपुरीत प्रत्येकी 5, बागलाण व सुरगाण्यात प्रत्येकी 4, देवळ्यात 3 व सिन्नरला एका टँकरच्या सहाय्याने जनतेला पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरव्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने एकूण 46 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यामध्ये मालेगावला 11, पेठला 9, देवळ्यात 7, नांदगावला 5, बागलाण, दिंडोरी व सुरगाण्यात प्रत्येकी 4 तसेच येवला व चांदवडच्या प्रत्येकी एका विहिरीचा यात समावेश आहे.