

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील नगरपंचायत, नगरपरिषद व संवर्ग कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी 2 मेपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे. निवेदनाच्या आशयानुसार, राज्यातील सर्व नगरपालिका, नगर परिषदा व नगर पंचायतीतील कर्मचार्यांचे विविध मागण्यांबाबत कामगार संघटनांच्या संघर्ष समितीचे पदाधिकार्यांची आयुक्त तथा संचालक, नगरपालिका प्रशासन संचालनालय वरळी, मंबई यांच्यासमवेत 2019 मध्ये बैठक झाली होती. या बैठकीमध्ये विविध विषयाबाबतच्या झालेल्या निर्णयावर अद्याप पावेतो शासनाने निर्णय झालेला नाही. तसेच महाराष्ट्रातील सर्व संघटनेच्या वतीने यापूर्वी दिलेल्या निवेदनावर देखील शासनाकडून चर्चा करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या 2 मे 2022 पासून कर्मचार्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी व मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती येथील सिटुचे सुधाकर आहेर व सुरेश आहेर यांनी दिली आहे. तरी नगरपंचायत कर्मचार्यांनी संप यशस्वी करावा, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.