नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लासलगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेसाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेच्या विस्तळीतपणामुळे नियोजन ढासळत होते. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठक घेत समिती तयार केली आहे. बैैठकीत नियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून १६ गाव पाणीपुरवठा योजनेचे प्रश्न सोडविले जाणार आहेत.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित १६ गाव पाणीपुरवठा योजनेवर प्रशासकीय मार्गदर्शन गटविकास अधिकाऱ्यांचे, तर तांत्रिक मार्गदर्शन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांचे असल्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकिला उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्यासह १६ गाव पाणीपुरवठा योजनेचे सदस्य उपस्थित होते.
सोमवारी (दि. १५) झालेल्या बैठकित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी समिती सदस्यांचे म्हणणे ऐकून घेत नियंत्रण समितीचा मार्ग काढला. जिल्ह्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या धर्तीवर १६ गाव पाणीपुरवठा योजनेची समिती तयार करण्यात आली आहे. यापूर्वी असलेली वर्किंग समिती आहे तीच राहणार असून, यामध्ये फक्त नियंत्रण समितीची भर घालण्यात आली असून, प्रशासकीय आणि तांत्रिक मार्गदर्शनासाठी अनुक्रमे गटविकास अधिकारी आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांचा समावेश करण्यात आला आहे.
वर्किंग कमिटीमध्ये १६ गावांच्या सरपंचांचा समावेश आहे. त्यांपैकी रोटेशन पद्धतीने अध्यक्षपद ठेवण्यात येईल. १६ गावांचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक हे या समितीचे सहसचिव असतील. तर ग्रामपंचायत ग्रामविस्तार अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.
माजी अध्यक्ष थोरे यांच्या मागणीला यश
सोळागाव पाणी पुरवठा योजनेच्या अनेक तक्रारी समोर आल्यानंतर समितीच्या कामकाजाविरोधात प्रकाश पाटील यांनी उपोषण सुरू केले होते. याच दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी जि.प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची भेट या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली होती.
हेही वाचा :