नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्र शासनाने 2022-23 च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर न केलेल्या राज्यातील 597 परिचारिकांच्या समायोजनास अखेर मंजुरी दिली आहे. या परिचारिकांची सेवा समाप्त केल्याने आरोग्यसेवेवर परिणाम होण्याची भीती होती. यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्लीत महाराष्ट्रासह वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी हा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. राज्यात 2022-23 च्या आराखड्यानुसार राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 3,207 पदे मंजूर होती. मात्र, सुधारित आराखड्यात 2,610 पदांनाच मंजुरी मिळाली होती. त्यामुळे 597 परिचारिकांचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांचे आता समायोजन होणार आहे. या परिचारिकांच्या सेवा समाप्त केल्याने आधीच रिक्तपदे असल्याने आरोग्यसेवेवर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे सर्व जिल्ह्यांतून या परिचारिकांना समायोजित करण्याची मागणी होत होती. यामध्ये ज्या परिचारिका एनयूएचएम, आरबीएसके, आदिवासी, बिगर आदिवासी, नक्षलग्रस्त व अर्बन आरसीएच अशा विविध ठिकाणी या सर्व कार्यरत होत्या. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 597 आरोग्यसेविकांना न्याय मिळाला आहे.