![नंदुरबारला ८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F10%2FCopy-of-Copy-of-Copy-of-Copy-of-Copy-of-Untitled-Design-14.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नंदुरबार दौऱ्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित नंदुरबार औद्योगिक वसाहतीतील जमीन सपाटीकरणाच्या तसेच औद्योगिक वसाहतीतील पाणी योजनेची क्षमता वाढवून देण्याला चालना मिळाली असून, जनरल पॉलिफिल्म लिमिटेड कंपनीच्या सुमारे ८०० कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यामुळे नंदुरबारच्या औद्योगिक विकासाचा जणू श्रीगणेशा झाला आहे.
आपले उद्योग परराज्यात गेले, अशा वावड्या उठविणाऱ्यांसाठी तर नवापूरच्या टेक्स्टाइल पार्कमध्ये गुजरातमधील उद्योजकांची गुंतवणूक हे चोख उत्तर असल्याचे प्रतिपादन सामंत यांनी केले. भूमिपूजन आणि जिल्हा औद्योगिक विकास मंहामंडळाची आढावा बैठक तसेच नावापूर टेक्स्टाइल इंडस्ट्रियल असोसिएशनसमवेत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार शिरिषकुमार नाईक, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा डोकारे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती संगीता गावित, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी, पी. डी. मलिकनेर, सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, प्रादेशिक अधिकारी अनिल गावित, अधीक्षक अभियंता झंजे, कार्यकारी अभियंता गणेश वाघ, जनरल इंडस्ट्रीजचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
नवापूर टेक्स्टाइल पार्कमध्ये ७०० मीटरच्या रस्त्याची मागणी आजच मंजूर करत असून विद्युत पुरवठ्यासाठी येणाऱ्या अडचणी तत्काळ दूर केल्या जातील. तसेच नंदुरबार औद्योगिक क्षेत्रात १२ दशलक्ष लिटरची पाणी योजना ही १८ ते २० दशलक्ष लिटर करण्यास तत्काळ मान्यता देताना नंदुरबारच्या औद्योगिक क्षेत्रात मूलभूत सेवा-सुविधांच्या विकासासाठी कुठलीही तडजोड केली जाणार नसून, येथील उद्योग आणि रोजगार हातातहात घालून विकसित व्हावेत, यासाठी पुढील आठवड्यात मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेऊन तत्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी सामंत यांनी दिले. आपल्या सरकारच्या काळात राज्यातील उद्योगांना त्यांच्या कामासाठी कुठल्याही प्रकारचे फेऱ्या व हेलपाटे न मारता जागेवरच आजपर्यंत सुमारे साडेसात हजार कोटींचा इन्सेंटिव्ह दिल्याचे सांगताना सामंत म्हणाले की, भूतकाळात राहून गेलेला इन्सेंटिव्हचा बॅकलॉगही येत्या काळात भरून काढणार आहे.
हेही वाचा :